पिंपरी, (प्रतिनिधी) – एक घास चिऊचा…एक घास काऊचा…, चिऊताईच्या पिला, खरं सांग मला… अशा अनेक बालगीतांमधून प्रत्येक मनुष्याच्या जीवनाचा बालपणापासूनच अविभाज्य चिमणी आता आपल्या घरापासून आणि शहरपासून खूप दूर होत चालली आहे. दोन दशकांपूर्वी शेकडोंच्या संख्येत दिसणार्या चिऊताईचा थवा आता दिसेनासा झाला आहे. मनुष्याच्या आधुनिक जीवनशैलीने लहानग्या गोंडस चिमणीला शहरातून हद्दपार केले आहे.
सुमारे दोन दशकांपूर्वी पिंपरी-चिंचवड शहरात चिमण्यांची खूप मोठी संख्या होती. परंतु काळ बदलत गेल्याने चिमण्या गायब झाल्या. आता कुठेतरी दोन-चार चिमण्या दिसतात. पूर्वी बैठ्या दगडा-मातीच्या घरात, पडवीत अंगणातल्या झाडांवर चिमणीला देखील आपला संसार थाटायची जागा मिळत होती. परंतु आता सिमेंट काँक्रिटच्या भिंती उभारल्या आहेत. या भिंतीमध्ये घर बनविण्याइतकी शक्ती त्या चिमुकल्याच्या लहानशी चोचीत नसल्याने तिला शहर सोडावे लागले.
हिरावले घरटे
पूर्वी शहरात मोठ्या संख्येने वाडे, चाळी, बंगले होते. यात बहुतांश घरे दगड, माती, विटांनी बनविलेली असायची. अनेक घरे कौलारु होती. येथे चिमण्या थोडी फट शोधून आपले घरटे बनवू शकत होत्या. परंतु कालांतराने उंच इमारतींमध्ये सिमेंट काँक्रिटच्या भक्कम भिंतीत तिला घरटे बनविण्याची सोय उरली नाही. तसेच झाडे, वेली देखील कमी झाल्याने चिमण्यांची संख्या वेगाने घटली आहे.
संपली माती
चिमणीला जगण्यासाठी माती खूप आवश्यक असते. चिमणी ही धूळ-मातीने आंघोळ करते. यामुळे तिच्या अंगावरील कीटक दूर होतात. तसेच मातीतील लहान-लहान जीव देखील तिचे खाद्य होते. परंतु आता सर्वत्र पेविंग ब्लॉक, सिमेंटचा कोबा झाला असून मोकळी माती उरली नाही.
कशी भागणार तहान
पूर्वी शहरात अनेक लहान-मोठे ओढे-नाले होते. चिमण्यांना पिण्यासाठी पाणी मिळत होते. आता या ओढ्या-नाल्यांची संख्या घटली असून जेवढे ओढे-नाले उरले आहेत ते अत्याधिक प्रदूषित झाले आहेत.
मिळेना अन्न
चिमण्यांचे मुख्य अन्न हे गवताच्या बिया, ज्वारी, बाजरी, तांदूळ आहे. परंतु आता गवत किंवा शेती उरलेली नाही. मनुष्य आपले अन्न चिमण्यांना खाऊ घालू लागला आहे. पृथ्वीतलावर केवळ मनुष्यच शिजविलेले अन्न खातो. शिजवलेले अन्न हा इतर कोणत्याही प्राण्याचा आहार नाही.
परंतु बळजबरीने पाळीव व इतर पशू-पक्ष्यांना शिजवलेले अन्न खाऊ घातले जाते. हा त्यांचा आहार नसल्याने त्यांच्यासाठी अपायकारक ठरतो. दोन दशकापूर्वी शहरात अनेक चिमण्या होत्या. पूर्वी चिमण्यांना धान्य टाकताना शेकडो चिमण्यांचा थवा यायचा. आता बोटावर मोजण्याइतपत चिमण्या येतात.
मनुष्याने स्वीकारलेल्या आधुनिक जीवनशैलीमुळे चिमण्यांचे अन्न आणि निवारा या दोन्ही बाबी हिरावून घेण्यात आल्या. त्यांच्यासाठी आवश्यक असलेली माती देखील राहिली नाही. कीटकनाशकांचा वाढता वापर देखील चिमण्यांसाठी घातक ठरला आहे. – उमेश वाघेला, पक्षीतज्ज्ञ