कोल्हापूर – कोल्हापूर, सांगली व बेळगाव जिल्ह्याच्या महापुरास कारणीभूत असणाऱ्या अलमट्टी धरणांची उंची वाढविण्याचा निर्णय रद्द करावा. तसेच कृष्णा, दुधगंगा, वेदगंगा व हिरण्यकेशी नद्यावरील पुलाचा भराव कमी करून कमानी बांधकाम करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांचेकडे केली.
सीमाभागामध्ये महापुराने थैमान घातले असून महापुराचे पाणीपातळी कमी होण्यास वेळ लागल्याने नागरी वस्तीत व शिवारात जास्त दिवस पाणी राहिल्याने शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. 2005, 2006, 2019 व 2021 या महापुराचा विचार करता 2021च्या महापुरात कोल्हापूर, सांगली व बेळगांव जिल्ह्यातील महापुराची परिस्थिती बदलले असल्याचे जाणवून आले आहे.
सध्या कृष्णा नदीवर महाराष्ट्र हद्दीपासून ते हिप्परगी धरणापर्यंत मोठे 6 पूल, हिरण्यकेशी नदीवर महामार्गावरील 5 पूल व दुधगंगा-वेदगंगा नदीवरील पूलांचे भराव महापुरास कारणीभूत ठरत असून चिकोडी तालुक्यांतील अंकली-मांजरी पुलाच्या भरावामुळे शिरोळ, हातकंणगले, चिकोडी व निपाणी तालुक्यांतील पुरस्थिती गंभीर होत आहे. यामुळे कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणांची उंची न वाढविता कृष्णा, दुधगंगा, वेदगंगा व हिरण्यकेशी नद्यावरील पुलाचा भराव कमी करून कमानी बांधकाम करण्याची मागणी केली.
यावेळी मुख्यमंत्री बोम्मई यांनी महापुराच्या समस्यासाठी तातडीची उपाययोजना म्हणून पुलांचे भराव कमी करून कमानी उभारणी करून पाणी प्रवाहित केले जाईल. तसेच महापुर नियंत्रणासाठी अभ्यासगट नेमून त्याबाबत उपाययोजना करत असून कर्नाटक सरकारकडून केंद्रीय जल आयोगाकडेही याबाबत पत्रव्यवहार केले असल्याची माहिती दिली.
सदर अहवाल आलेनंतर पुढील उपाययोजनासाठी लवकरच मंत्रालयात बैठकीसाठी शेतकरी प्रतिनिधी म्हणून राजू शेटटी यांना या बैठकीसाठी निमंत्रीत केले. यावेळी कर्नाटक राज्य व केंद्र सरकारचे समन्वयक मंत्री शंकरगौंडा, खासदार आण्णासाहेब ज्वोले उपस्थित होते.