बीजिंग – चीनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांच्या व्हिसावर चीनकडून निर्बंध घालण्यात आले आहेत. त्यामुळे या नागरिकांना भारतात परतणे अवघड बनले आहे. मात्र चीनने या निर्बंधांचे समर्थनच केले आहे.
कोविड-19 चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी हे निर्बंध आवश्यकच आहेत. या निर्बंधामुळे केवळ भारताला लक्ष्य केले जात नाही. तर परदेशातून परतणाऱ्या चीनी नागरिकांवरही हे निर्बंध लागू आहेत, असे चीनने म्हटलेले आहे. येत्या काही काळात हे निर्बंध शिथील केले जाण्याची शक्यता चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुन्यिंग यांनी फेटाळून लावली आहे. चीनकडून दीर्घकाळापासून लागू करण्यात आलेल्या या प्रवास बंदीवर चीनमधील भारतीय राजदूत विक्रम मिस्री यांनी टीका केली आहे.
मोठ्या प्रमाणावर भारतीय नागरिक आणि विद्यार्थी चीनमध्ये अडकलेले आहेत. त्याचप्रमाणे चीनी नागरिक आणि विद्यार्थीही भारतात अडकून पडले आहेत. दोन्ही देशांमधील या अडकलेल्या नागरिकांना आपापल्या देशांमध्ये परतणे चीनच्या प्रवासी निर्बंधांमुळे अवघड झाले आहे. भारत आणि चीन दरम्यानची विमानसेवाही करोनाच्या साथीमुळे स्थगित करण्यात आली आहे.