पुणे – हक्क सोडपत्राची नोंद सातबाऱ्यावर करण्यासाठी 50 हजार रुपये लाचेची मागणी करुन तडजोडीअंती 30 हजार रुपये स्विकारणाऱ्या चऱ्होलीच्या तलाठीस लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली आहे. मारुती अंकुश पवार (41) असे कारवाई करण्यात आलेल्या लाचखोर तलाठयाचे नाव आहे.
एसीबीकडे तक्रार दाखल केलेल्या 41 वर्षीय व्यक्तीने चऱ्होलीचे तलाठी यांच्याकडे मृत्युपत्राची व हक्क सोडपत्राची नोंद सातबारा उताऱ्यावर करावयाचा अर्ज दिला होता. परंतु सदर नोंद करण्यासाठी तलाठी पवार यांनी 50 हजार रुपयांची मागणी केली.
तडजोडीअंती 30 हजार रुपये ते स्विकारत असताना एसीबीचे पथकाने सापळा रचून त्यांना रंगेहाथ अटक केली. त्यांच्या विरोधात दिघी पोलीस ठाण्यात याप्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती एसीबीचे पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे यांनी दिली आहे.