देवळासमोर गावकरी जमले व गाऱ्हाणे मांडले. हे देवा महाराजा… होय महाराजा… म्हणत गावकऱ्यांनी आरोळी ठोकली. वादळ नुकतेच येऊन गेले व सर्वत्र वाताहत झाली. अशावेळी सर्वांना सरकारी व इतर मदत तसेच सर्वांचे पुनर्वसन होऊन पुन्हा असे संकट न येवो असे गाऱ्हाणे घातले गेले.
सरपंचाने बोलवल्याने सारे देवळाबाहेर येऊन बसले. पंचांनी सुरुवात केली की, आलेल्या आपत्तीची कल्पना सगळ्यांना आहेच पण कुठे जीवितहानी झाली नाही हे आपले सुदैव. मग सर्व वेगवेगळ्या गटांत विभागलेल्या लोकांची यादी केली गेली. तसेच बाहेरून मदत करणाऱ्यांची नावेही त्यात टाकली गेली. कोणत्या गटाने पडलेली झाडे उचलायची, कुणी पडलेल्या तारा बाजूला करायच्या. या अस्मानी संकटातून बाहेर पडण्याकरता सरपंचांनी ताबडतोब गावासाठी मदतीची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे केली. मुंबईच्या चाकरमान्यांनीही भरघोस मदत देऊ केली. महिला बचत गटाने पुढाकार घेऊन मदत वाटप करायचे ठरवले.
मग सरपंचांनी विचारले, “अजून कोणाला काय बोलायचे?’ यावर बबन म्हटला की, “काही लोकांकडे मदतीचे अर्ज आले; पण सर्वांना ते मिळालेले नाहीत’. त्यावर बाळू म्हणाला, “अरे, अर्ज कमी आले होते, माझ्याकडे घेऊन ठेवले आहेत’. नाही म्हटले तरी थोडा फार पक्षपात होताच त्यामुळे काही ठरावीक लोकांकडे अर्ज आले होते हे सरपंचांच्या लक्षात आले. सरपंचांनी बाळूला म्हटले, “तालुक्यात जाऊन त्यांच्या झेरॉक्स काढून आजच्या आज सर्वांना ते वाटून द्या’. बाळूने मान डोलवली; पण उगाचच बबनकडे रागाने पाहू लागला.
सरपंच म्हणाले, “तुम्हाला माहीत आहे, आपल्या गावात पक्ष वगैरे काही चालत नाही त्यामुळे सर्वांना मदत मिळेल याची काळजी घ्यावी. बाकी काय?’ एवढ्यात जाना म्हणाला, “गावांमध्ये काही नेत्यांचे स्वागताचे बोर्ड सर्वत्र लागलेले आहे. मुद्दाम काही विशिष्ट लोकांच्या घरासमोर लावलेले आहे’. दोन्हीही गट एकमेकांकडे पाहू लागले. पंचांनी विचारले, मोठमोठे बॅनर कुणी लावले? कारण “वरून’ दिलेले बॅनर गावातील तरुणांनीच लावले होते. कुणीही बोलेना.
मग एक म्हातारा म्हणाला, “आता नीट ऐका, बोर्ड कुणी लावले ते सोडून द्या. ज्यांच्या ज्यांच्या घरासमोर बोर्ड आहेत ते त्यांनी काढून घ्यावे. कापडी असतील तर सरळ घरात गादीवर टाका किंवा कशासही वापरा. प्लॅस्टिकचा कपडा असेल तर कौलावर टाका किंवा बाहेर कोंबड्यांच्या खुराड्यावर टाका. ते उपयोगी येतील. जास्त विचार करू नका व आपापसात वाद घालू नका. आता आपल्याकडे वेळ जास्त नाही. सर्वांनी पटापट आपापल्या कामाला लागा व गावात वीज आणायची आहे’. त्यानंतर सर्व गावकरी कामाला लागले…
– उत्तम पिंगळे