जरा पडल्यागत असलेला भुऱ्या उठला आणि हळूच झोपडी बाहेर आला. लागोलग काना, बरकू, गोमा, चिंधू आणि दत्तूला हाक दिली. रात्रीचे दोनबिन वाजले असतील सर्वजण आपापली हत्यारे घेऊन जंगलाच्या दिशेने निघाले. तसेही ते जंगलातच तर राहत होते. गडचिरोलीतील जंगलातच या दहा एक कुटुंबांची वस्ती होती. शिकार करणे त्यांचा मुख्य धंदा होता.
दोन एक दिवसाआड नेहमी रात्री बाहेर पडून जे काय मिळेल ते घेऊन यायचे. आत गेल्यावर दोन तास झाले तरी काही सावज घावायची चिन्ह नाही. इतक्यात बाजूच्या झुडपात काहीतरी हालचाल झाली. सर्वजण सावध झाले व एकदम त्या छोट्या झुडपाला घेराव घातला आणि एक मध्यम आकाराचे रानडुक्कर त्यांना दिसले. त्यांच्या शस्त्रांनी ते जागीच ठार झाले.
सर्वांना अत्यानंद झाला. ते आरोळ्या मारू लागले. कारण खूप दिवसांनी रानडुक्कर मिळाले होते. पहाटे पहाटेच सर्वजण झोपड्यांकडे परतले. त्यांच्या गोंगाटाने बाया माणसे जाग्या झाल्या. मग डुक्कर त्यांच्या हवाली करून बापे मंडळी जरा झोपले.
मग बायाबापड्यांनी पटापट उठून आवराआवर करून डुकराचा चांगला बेत ठरवला. मग बापे मंडळी साधारण साडेसातला हळूहळू उठू लागली. छोटी पोरे बाळेही त्यांच्या थोडे आधी उठली होती. एकीकडे डुक्कर शिजत पडले होते दुसरीकडे बायाबापड्या भाकर तुकड्यांची जुळवाजुळव करत होत्या. पोरेटोरेही जवळ आजूबाजूला उभी होती. बऱ्याच दिवसांनी असे जेवण मिळणार होते. बेत जमल्यावर पहिले पोराटोरांना वाढले.
ती मग खाऊन गेली फिरायला. मग बापे लोक बसले एक दोघांनी बाजूलाच सिंदीची बाटली घेऊन ठेवली. तासभर जेवण झाल्यावर सर्व बापे उठून झोपडीत गेले आराम करायला.
बाया माणसांनी मग जेवायला घेतले. त्यांनाही जेवायला बराच वेळ लागला कारण बरेच दिवसांनी असे अन्न मिळाले होते. जेवल्यावर त्यांनी आवराआवर केली. थोडे ऊन आवरल्यावर बाया पण जंगलाकडे गेल्या. काय फळे वगैरे मिळतात का बघत होत्या. तासाभरात बरेच काही जंगलातून घेऊन वस्तीपाशी आल्या.
सांच्याला पुरुष मंडळी परत उठली. बाहेर येऊन विडीचा झुरका घेऊ लागली. संध्याकाळचे जेवण तयारच होते कारण तसा डुक्कर खूप लहान नव्हता. पोरं पण जंगलातून काय काय घेऊन आली. सारेजण एकत्रच बसले होते. आज मोठी मेजवानी मिळाल्याने आनंदीच होते.
त्यांना बाहेर काय चालले ते माहीत नव्हते. मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग यांच्याशी त्यांचा काहीही संबंध नव्हता. करोना काय आहे? कोण आहे? त्याचे परिणाम काय होतात याबद्दल त्यांना काहीही माहीत नव्हते. आणि हो बहुतेक त्यांना ते माहीत असणे आवश्यकही नव्हते. तेच खरे आनंदयात्री आहेत.
– उत्तम पिंगळे