शुक्रवारच्या नमाजपठणावर नंतर आंदोलन
राज्यात पोलिसांवर अनेक ठिकाणी दगडफेक
लाठीमाराच्याही जागोजागी घटना
निदर्शनामुळे राज्यात तणावाची स्थिती
कानपूर : सुधारीत नागरिकत्व कायद्याविरोधात उत्तर प्रदेशात शुक्रवारी मोठ्या प्रमाणात निदर्शने करण्यात आली. या निदर्शनांना हिंसक वळण लागले. पोलिसांनी केलेल्या गोळीबारात कानपुरात सात जण जखमी झाल्याचे प्राथमिक वृत्त असून फिरोजाबाद येथे पोलिसांच्या गोळीबारात एकाचा मृत्यू झाला. जखमीपैकी तिघांना छातीत गोळी लागल्याने त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.
गोरखपूर, देवबंद (साहरणपूर), मुझफ्फरनगर, हापूर, शाम्ली, प्रयागराज, बुलंदशहर, मीरत, फिरोझाबाद, वाराणसी, फारूखाबाद, बिज्नोर, भांडोई आणि हमीरपूर येथेही प्रतिबंधात्मक आदेश धुडकावत निदर्शने केली. त्याला हिंसक वळण लागले. त्यामूळे अख्खे राज्यच पेटल्याचे चित्र निर्माण झाले आहे. काही जिल्ह्यात तणावाची स्थिती असून पुरेसा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे, असे पोलिस महासंचालक प्रविणकुमार यांनी सांगितले.
कानपूरच्या बाबूपुर्वा भागात केलेल्या गोळीबारात सात जण जखमी झाले. शूक्रवारच्या नमाजनंतर या भागात निदर्शनांना सुरवात झाली. जमावबंदी आदेश हजारो जणांनी मोडला. हलीम मुस्लीम कॉलेज ते फुलबघा या चार किमी अंतराचा मोर्चा काढला. यतीमखाना भागात हा मोर्चा पोहोचल्यावर आंदोलकांनी हुल्लडबाझीला सुरवात केली. एका शोरूमचे मोठे नुकसान केले. पोलिसांवर दगडफेक सुरू केली. त्यामुळे पोलिसांनी लठीमार करून जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. शहर काझी अलाम राझा यांनी निदर्शने थांबवून घरी जाण्याची विनंती केल्यावर परिस्थिती नियंत्रणात आली.
फिरोझाबादमध्येही शुक्रवारी हिंसक आंदोलन घडले. संतप्त जमावाने रस्त्यातील वाहने पेटवून दिली. पोलिसांवर दगडफेक केली. पोलिसांनी तेथे गोळीबार केला. त्यात एकाचा मृत्यू झाला. शाम्ली, हापूर आणि मुझफ्फरनगरमध्येही निदर्शने आणि तणावाचे वातावरण होते. शाम्लीत पोलिसांनी जमावाला काबूत आणण्यासाठी सौम्य लाठीमार केला. हापुर आणि मुझफ्फरनगर येथे पोलिसांवर दगडफेक झाली. गोरखपूरमध्ये दगडफेक करणाऱ्यांना पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीमार केला.