लोणी काळभोर -करोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी असल्याने दळणवळणाच्या सुविधा बंद करण्यात आल्या होत्या. त्यानंतर अनेक परप्रांतीय नागरिक गावाच्या दिशेने पायी निघाले होते. त्यांतील सुमारे 150 जणांना लोणी काळभोर (ता. हवेली) येथे अडवून निवारा गृहांमध्ये क्वारंटाइन करण्यात आले होते. त्यातील 41 जण रविवारी (दि. 10) एका विशेष बसने कर्नाटककडे रवाना झाले.
महाराष्ट्र व कर्नाटक या दोन्ही राज्यांतील सर्व शासकीय प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांकडून आदेश आला. तत्पूर्वी ही प्रक्रीया लवकर पूर्ण व्हावी यासाठी कर्नाटकातील वंजारा समाजाचे राज्य प्रमुख शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या संपर्कात होते.
दरम्यान, सर्वांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर 13 पुुरूष, 12 महिला, 16 लहान मुले अशा एकूण 41 जणांना घेऊन एक खासगीद्वारे दुपारी एक वाजता हे प्रवासी कर्नाटककडे रवाना झाले.
ही विशेष बस राजलक्ष्मी मंगल कार्यालयां समोर आल्यानंतर ती निर्जंतूक केल्यानंतर सर्व प्रवाशांना गाडीत बसवण्यात आले. यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बंडगर, लोणी काळभोरचे तलाठी दादासाहेब झंजे, ग्रामविकास अधिकारी डी. के. पवार, प्रवीण देसाई आदी उपस्थित होते. सर्व प्रवाशांनी सकाळचा नाश्ता व दुपारचे जेवण कार्यालयांत केले होते. बसमध्ये बसलेनंतर महसूल व ग्रामपंचायत प्रशासनाचे वतीने लहान मुलांना बिस्कीटाची पाकीटे तर सर्वांना पाण्याच्या बाटल्या देण्यात आल्या.