दीपिका पादुकोणच्या “छपाक’ चित्रपटाची सध्या चर्चा आहे. “छपाक’ ही एक अशी कहाणी आहे, जी समाजाला सांगितली जाणे आवश्यकच होते. हा केवळ एक चित्रपट नाही, तर ऍसिड हल्ल्याच्या प्रकरणाचा “केस स्टडी’ आहे. गेल्या दहा वर्षांच्या काळात भारतात ऍसिड हल्ल्यांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. एका आकडेवारीनुसार, 2010 मध्ये भारतात ऍसिड हल्ल्याची 80 प्रकरणे दाखल करण्यात आली होती. 2014 मध्ये अशा 225 प्रकरणांची नोंद झाली तर 2016 मध्ये प्रकरणांची संख्या 307 पर्यंत वाढली होती. ही केवळ पोलीसदफ्तरी नोंद झालेल्या प्रकरणांची आकडेवारी असून, प्रत्यक्ष आकडा याहूनही मोठा असण्याची शक्यता आहे.
ऍसिड हल्ला हे महिलांविषयक गुन्ह्यांचे सर्वांत क्रूर रूप आहे. ऍसिड हे एक अत्यंत स्वस्त आणि सुलभपणे उपलब्ध होणारे हत्यार असून, त्याचा उपयोग सूड घेण्यासाठी केला जातो. महिलेकडून मिळालेल्या नकाराचा सूड उगवण्यासाठी ऍसिड फेकून तिचा चेहराच विद्रूप करण्याची ही विकृत मानसिकता आहे. परंतु संबंधित महिलेला या घटनेचे परिणाम आयुष्यभर भोगावे लागतात. हल्ल्यानंतर संबंधित महिलेला समाजाशीही झुंजावे लागते. त्याचबरोबर उपचारांसाठी येणाऱ्या प्रचंड खर्चाने कुटुंबियांचे कंबरडे मोडते. कंबोडिया तसेच दक्षिण आशियातील भारत, पाकिस्तान आणि बांगलादेश हे या बाबतीत बदनाम देश आहेत.
गेल्या पंधरा वर्षांत भारतात ऍसिड हल्ला हा एक वारंवार घडणारा गुन्हा ठरला आहे. ऍसिड हल्ल्याला समाजात खोलवर रुजलेली पुरुषी मानसिकताच कारणीभूत असून, विवाहाचा प्रस्ताव किंवा शारीरिक संबंधांना नकार देणे, मनाजोगा हुंडा न मिळणे, पत्नीने मुलीला जन्म देणे, आवडीचे जेवण न बनविणे किंवा आणखी कोणताही हुकूम महिलेने न मानणे या मानसिकतेला बिलकूल सहन होत नाही. असे काही घडताच सूड म्हणून महिलेला “शिक्षा’ देण्यासाठी ऍसिडसारख्या शस्त्राचा वापर केला जातो आणि महिलेसाठी ती जन्मभराची शिक्षा होऊन बसते.
गेल्या दहा वर्षांच्या काळात भारतात ऍसिड हल्ल्यांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. मीर फाउंडेशन ही शाहरुख खानची स्वयंसेवी संस्था ऍसिड हल्लापीडितांसाठी काम करते. या संस्थेच्या वेबसाइटवर दिलेल्या आकडेवारीनुसार, 2010 मध्ये भारतात ऍसिड हल्ल्याची 80 प्रकरणे दाखल करण्यात आली होती. 2014 मध्ये अशा 225 प्रकरणांची नोंद झाली तर 2016 मध्ये प्रकरणांची संख्या 307 पर्यंत वाढली होती. ही केवळ पोलीसदफ्तरी नोंद झालेल्या प्रकरणांची आकडेवारी असून, प्रत्यक्ष आकडा याहूनही मोठा असण्याची शक्यता आहे. तसे पाहायला गेल्यास ऍसिड हल्ल्याच्या घटना भारतात फार पूर्वीपासूनच घडत आहेत. परंतु ऍसिड हल्ल्यातील पीडिता लक्ष्मी अग्रवाल यांनी धाडसाने संघर्ष केल्यानंतर अशा घटनांचे गांभीर्य समाजाला कळून चुकले आणि समाजाने ते मान्यही केले.
ऍसिड हल्ल्याची घटना हा सर्वोच्च न्यायालयाने एक गंभीर गुन्हा मानला आणि त्यासाठी शिक्षा देताना भारतीय दंडसंहितेत कलम 326 अ आणि 326 ब या कलमांचा समावेश करण्यात आला. तेव्हापासून ऍसिड हल्ला हा अजामीनपात्र गुन्हा मानला गेला असून, त्यासाठी कमीत कमी दहा वर्षांच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. त्यांनी केलेल्या याचिकेनंतरच
सर्वोच्च न्यायालयाने ऍसिडची विक्री केवळ नोंदणीकृत दुकानांमधूनच केली जावी, असा आदेश दिला.
“छपाक’ या चित्रपटाचे कथानक ऍसिड हल्लापीडित लक्ष्मी अग्रवाल यांच्या जीवनसंघर्षातून प्रेरणा घेऊन बेतले आहे. त्यांच्या जीवनातील ती घटना, संघर्ष आणि त्यांची चिकाटी या गोष्टी “छपाक’ चित्रपटात अत्यंत जबाबदारीने दर्शविण्यात आल्या आहेत. चारचौघींसारख्या मालतीची (दीपिका पदुकोण) ही कहाणी आहे. इतर मुलींप्रमाणेच सुरू असलेला तिचा जीवनक्रम अचानक बदलतो, तो बशीर खान नावाचा शिलाईकाम करणारा एक युवक तिच्यात भलताच रस घेऊ लागतो, तेव्हा. बशीरचे तिच्या घरी येणे-जाणे सुरू असते आणि मालती त्याला भैया म्हणून संबोधत असते. परंतु बशीरचे तिच्यावर एकतर्फी प्रेम जडते आणि तो फोनवर तिला मेसेज पाठवू लागतो.
अचानक या बाबी सुरू झाल्यामुळे नेमके काय करावे, हे मालतीला समजत नाही आणि कुणाशी काहीही न बोलता ती बशीरकडे दुर्लक्ष करू लागते. एके दिवशी बशीर मालतीला दुसऱ्याच एका मुलाबरोबर फिरताना पाहतो. मालती सतत आपल्याला दुर्लक्षित करते आणि दुसऱ्या मुलाबरोबर हिंडते-फिरते हे पाहून खवळलेला बशीर आपल्याच कुटुंबातील एका महिलेच्या मदतीने मालतीच्या चेहऱ्यावर ऍसिड फेकतो आणि त्यानंतर मालतीचे आयुष्यच बदलून जाते. तिचा चेहरा पूर्णपणे बदलून जातो आणि त्याबरोबरच समाजाचा तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन आणि वर्तणूकही बदलते. परंतु या सर्व घटनाक्रमात तिच्या वडिलांची मालकीण शिराज आणि त्यांची वकील अर्चना (मधुरजीत सरघी) हे त्यांच्या पाठीशी उभे राहतात आणि त्यांना लढण्यासाठी बळ देतात.
याच दरम्यान ऍसिड हल्लापीडित मुली आणि महिलांसाठी संस्था चालविणाऱ्या अमोल (विक्रांत मेसी) यांच्याशी मालतीची ओळख होते. मालतीही या संस्थेसोबत काम करू लागते आणि स्वतःबरोबरच अन्य ऍसिड हल्लापीडित मुलींची लढाई प्रबळ करते. ऍसिडची विक्री रोखण्यासाठी ती न्यायालयात जनहित याचिकाही दाखल करते आणि या खटल्यात बऱ्यापैकी यशही मिळविते. “छपाक’ चित्रपट या चित्रपटाचे श्रेय मालतीची भूमिका ताकदीने वठविणाऱ्या दीपिका पदुकोणचेच आहे. या भूमिकेत ती स्वतःचा चेहरा घेऊन नव्हे तर मालतीचा चेहरा घेऊन आली आहे. परंतु तरीही क्षणभरासाठी तिच्या चेहऱ्यावरून प्रेक्षकांची नजर हटत नाही. पडद्यावर आपल्याला दीपिका नव्हे तर मालतीच दिसते. मालतीचे पात्र दीपिका पूर्णांशाने जगली आहे आणि या पात्राच्या सर्व छटा आणि बारकावे हुबेहूब पकडण्याचा तिने यशस्वी प्रयत्न केला आहे. विक्रांत मेसीनेही दीपिकाला उत्तम साथ दिली आहे. एका सामाजिक कार्यकर्त्याच्या रूपाने त्याचा अभिनयही बारकाव्यांनी परिपूर्ण झाला आहे. मधुरजीत सरघीने रंगविलेली वकिलाची भूमिकाही प्रभावी ठरली आहे.
मेघना गुलजार यांचा महिलाप्रधान चित्रपट तयार करण्यात हातखंडा आहे. यापूर्वी तलवार आणि राजीसारख्या चित्रपटांत त्यांची कमाल प्रेक्षकांनी अनुभवली आहे. या चित्रपटातही गांभीर्याशी कोणत्याही प्रकारे खेळ न करता या गंभीर घटनेला त्यांनी चित्रपटाचे स्वरूप दिले आहे. अतिरेकी अभिनय करण्याची पुरेपूर शक्यता असतानासुद्धा दीपिकाची भूमिका त्यांनी अतिनाट्यापासून मुक्त ठेवले आहे आणि आपल्या दिग्दर्शनातील हातोटीने मुख्य प्रवाहातील प्रसिद्ध अभिनेत्रीकडून त्यांनी उत्कृष्ट भूमिका करवून घेतली आहे. “छपाक’सारख्या अत्यंत उत्कृष्ट आणि समाजाच्या दृष्टीने गरजेच्या चित्रपटालाही द्वेष आणि राजकीय बहिष्काराला सामोरे जावे लागले हे दुर्दैवच म्हणावे लागेल.
एखाद्या कलावंताने राजकीय भूमिका घेणे भारतात किती धोक्याचे झाले आहे, हेच यातून दिसून येते. जवाहरलाल नेहरू विद्यापीठात (जेएनयू) झालेल्या हल्ल्यानंतर तेथे आंदोलनकर्त्यांना भेटण्यासाठी दीपिका विद्यार्थ्यांमध्ये गेली. त्यानंतर सोशल मीडियावर तिला ट्रोल करण्यास सुरुवात झाली. ट्रोल-सेनेने “छपाक’वर बहिष्कार घालण्याची मोहीम छेडली. ट्विटरवरही “छपाक’वर बहिष्कार घालण्याची मोहीम सुरू झाली. लक्ष्मी अग्रवालवरील ऍसिड हल्ला प्रकरणातील प्रमुख आरोपी नदीम खान याचे नाव बदलून चित्रपटात ते राजेश असे करण्यात आले आहे, अशी अफवा पसरविण्यात आली. केंद्रीय मंत्री बाबुल सुप्रियो यांच्यासारख्या व्यक्तीसुद्धा ही अफवा पसरविण्यात आघाडीवर दिसल्या.
दरम्यान, भारत सरकारच्या कौशल्य विकास कार्यक्रमाच्या ज्या जाहिरातपटात दीपिका पदुकोणने अभिनय केला आहे, त्याचे प्रदर्शन रोखण्याचा निर्णय सरकारने घेतल्याचीही बातमी आली. एवढेच नव्हे तर सरकारमधील मंत्रीही दीपिकाच्या विरोधात गेले. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी असे वक्तव्य केले की, “जे लोक देशाचे तुकडे करू इच्छितात त्यांना दीपिका साथ देत आहे.’ परंतु सर्वांत वाईट प्रतिक्रिया मध्य प्रदेशातील भाजप नेते गोपाल भार्गव यांची होती. “छपाक’ ही एक अशी कहाणी आहे, जी समाजाला सांगितली जाणे आवश्यकच होते. हा केवळ एक चित्रपट नाही, तर ऍसिड हल्ल्याच्या प्रकरणाचा “केस स्टडी’ आहे. आशय हीच चित्रपटाची ताकद आहे आणि आशयापासून चित्रपट कुठेही भरकटत नाही. कोणतीही लेक्चरबाजी न करता एका ऍसिड पीडितेच्या वेदना आणि संघर्ष हा चित्रपट दाखवतो. ऍसिड पीडितेला “गरीब बिचारी’ न दाखवता संघर्ष करणारी रणरागिणी म्हणून हा चित्रपट आपल्यासमोर आणतो. अत्यंत गुंतागुंतीच्या विषयावरील हा एक सुंदर चित्रपट असून, मुलीच्या चेहऱ्यावर पडलेल्या ऍसिडप्रमाणेच तिच्या मेंदूवर पडलेल्या ऍसिडचे परिणामही तो आपल्याला दाखवतो.
प्रसाद पाटील