इंदापूर तालुक्यात बागांमध्ये फूलगळती : उत्पादनात घट येणार
भवानीनगर- इंदापूर तालुक्यातील तेल्या रोगाने गेल्यावर्षी डाळिंबाच्या बागा पूर्णपणे वाया जाऊन शेतकऱ्यांच्या हाती एक रुपयाही उत्पादन उरले नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाला होता. यावर्षी अवकाळी पाऊस पडल्याने डाळिंबाच्या झाडांना लागलेली फुलकळी गळून पडल्याने पुन्हा डाळिंबाच्या बागा वाया गेल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.
इंदापूर तालुक्यात डाळिंबाच्या बागांचे क्षेत्र मोठ्या प्रमाणात असल्याने या भागातील डाळिंब हे एक्सपोर्ट केले जातात. डाळिंब हे उच्च प्रतीचे शेतकरी डाळींबाचे उत्पादन घेत आहेत. गेल्यावर्षी तेल्यासारखा भयंकर रोग डाळिंब बागांवर पडल्याने संपूर्ण बागा उध्द्वस्त झाल्या आहेत.
शेतकऱ्यांपुढे हा रोग कसा थांबवता येईल, हा एकमेव प्रश्न पडला होता. यातून विविध प्रकारे औषध फवारणी करून देखील तेल्या रोग शेतकऱ्यांना आटोक्यात आणता आला नाही. त्यामुळे गेल्यावर्षी इंदापूर तालुक्यातील डाळिंबाच्या बागा उत्पादनाविना वाया गेल्या होत्या. यावर्षी शेतकऱ्यांना डाळिंबाच्या बागेतून चांगल्या प्रकारे उत्पादन मिळेल, अशी आशा असतानाच मोठ्या प्रमाणात वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाल्याने बागेतील झाडांना फुलकळी लागलेली होती. ती फुलकळी गळून पडली. बागेतील ज्या झाडांना साधारण 200 च्या पुढे फळ लागत होते. त्या झाडांना फक्त आत्ता पंचवीस ते तीस फळे लागलेली आहेत. त्यामुळे डाळिंब बागाचे एकरी उत्पादन हे साधारण चार ते पाच टन निघण्याऐवजी एक ते दोन टन एवढेच डाळिंबाचे उत्पादन निघणार आहे. अशी शक्यता सध्या दिसत आहे.
सध्या ज्या डाळिंबाच्या बागांना फळे लागलेली आहेत. त्या बागांची छाटणी डिसेंबरमध्ये केली आहे. त्यामुळे साधारण मे ते जून यादरम्यान डाळिंबाची विक्री केली जाते. परंतु यावेळी अजूनही मोठ्या पावसाने हजेरी लावली तर शेतकऱ्यांच्या हातात ज्या काही डाळिंबाच्या बागा उरलेल्या आहेत. त्याही पूर्णपणे संपून जाऊ शकतात. याची भीती शेतकऱ्यांना लागून राहिली आहे. डाळिंबाच्या बागांना मर रोगाने ग्रासले आहे. झाडांना मर रोग लागल्यानंतर हे झाड बुडापासून पूर्णपणे वाळून जाऊन निकामी होत आहेत. त्यामुळे इंदापूर तालुक्यातील शेतकऱ्यांची बिकट अवस्था झाली आहे.
डाळिंब उत्पादनापेक्षा डाळिंबाच्या बागा जगवण्यासाठी खर्च ज्यादा लागत आहे. दरवर्षी डाळिंबाच्या बागांवर नवनवीन रोग पडत असल्याने निसर्गही ही शेतकऱ्यांना साथ देत नसल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. डाळिंबाच्या उत्पन्नाला तर शेतकरी पूर्णपणे मुकलेला आहे. यावर्षी अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागाही उद्ध्वस्त झालेले आहेत. इंदापूर तालुक्यात फळबागांचे मोठे प्रमाणात उत्पादन घेतले जाते. परंतु सध्या शेतकऱ्यांच्या डोक्यावर कर्जाचा बोजा वाढत आहे. त्यामुळे नगदी उत्पन्न घेणारा शेतकरीही हतबल झाला आहे.
- गेल्यावर्षी दहा एकर डाळिंबाची बाग ही केवळ तेल्या रोगामुळे पूर्णतः वाया गेली. एकूण आठ ते दहा लाख रुपये तोटा झाला आहे. यावर्षीही अवकाळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे डाळिंबाच्या झाडाला लागलेली फुले गळून पडल्याने यावर्षीही डाळिंबाचे उत्पादन कमी प्रमाणात निघणार आहे. शेतकरी अजूनही कर्जबाजारीच होणार आहे.
– हनुमंत बाळासाहेब पवार, डाळींब उत्पादक शेतकरी, काझड.