आमचा बालमित्र हरिदासने यंदाचा एक जोरदार संकल्प सोडला होता. एक जानेवारीपासून रोज पहाटे बागेत नियमित येऊन किमान एक किलोमीटर चालायचं. शरीरातल्या (स्वभावातल्या नाही, त्याच्या स्वभावात शुगरबिगर अजिबात नाही!) शुगरचा बीमोड करायचा.
शुगर ही हरिदासची बालमैत्रीण आहे. लहानपणी हुंदडताना आमचे खिसे गोट्या, चिंचोके आणि इतर वस्तूंनी भरलेले असत. हरिदासच्या खिशात आईने केलेले लाडू, गोळ्या, चॉकलेटं, खडीसाखर, बत्तासे, साखरफुटाणे अशा गोष्टींनी भरलेले असत. बोलताना आणि झोपलेला असताना- हे दोन प्रसंग वगळले तर त्याचं तोंड सतत काहीतरी गोड खात असे. आम्ही लहानाचे मोठे झालो. नोकऱ्या लागल्या. हरिदाससाठी मुलगी बघायला नागपूरला गेलो तेव्हा मुलीकडच्यांनी कांदेपोह्यांबरोबर तिकडची खासियत अशी सांभार वडी केली होती. गोडाचा पदार्थ म्हणून बेसन लाडू केले होते.
हरिदासने पोहे आणि सांभार वडी मोठ्या अनिच्छेने संपवून लाडूकडे मोर्चा वळवला. पुन्हा पुन्हा मागून लाडू खाल्ले. त्या लाडवांचे इतके कौतुक केले आणि मुलगी पसंत असल्याचे व्यक्त करताना त्या लाडवांचे इतके कौतुक केले की निरोप घेताना भावी सासूबाईंनी स्टीलचा डबा भरून लाडू दिले. लहानपणी परीकथेत राजपुत्र कामगिरीवर निघाला की त्याला आई तहान लाडू आणि भूक लाडू देते तसे सासूबाईंनी हरिदासला बेसन लाडू दिले. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे परतीच्या प्रवासात त्याने एकट्याने तो डबा रिकामा केला!
आमच्या या गुणविशिष्ट हरिदासच्या शरीराचा कानाकोपरा शुगरने व्यापावा यात काय नवल? सीमावर्ती भागात घुसखोरांनी ठाण मांडल्याचे आपण पेपरात वाचतो, तद्वत हरिदासच्या शरीरात शुगरने ठाण मांडले आहे. महाभारतात वर्णन आहे की कर्ण पहाटे गंगेवर स्नानाला निघाला की स्त्रिया त्याच्याकडे टक लावून बघत. आमचा हरिदास रस्त्यावरून फिरायला जाताना वाटेत मुंग्या असतील तर त्या देखील त्याच्याकडे अशा बघत असतील.
खरे म्हणजे ही घुसखोरी थांबवायला हवी. पण हरिदासचे या बाबतीतचे धोरण भलतेच कचखाऊ आहे. कचखाऊ म्हणण्यापेक्षा साखरखाऊ आहे. आजही पंगतीत तो इतर पदार्थ खाल्ल्यावर डझनभर जिलब्या किंवा दोन डझन डॉलरजिलब्या किंवा चार डझन अंगूरमलई संपवल्याखेरीज खाद्ययज्ञ थांबवीत नाही. बुफे पंगत असेल तर तो बुफेच्या टेबलाजवळच उभा रहातो.
या शुगरखोरीमुळे हरिदासचा देखणा देह अगडबंब झाला नसता तरच आश्चर्य वाटलं असतं. साडेचार फूट उंची असलेल्या हरिदासला एक्सएक्सएक्सएक्सएक्सएल मापाचे सदरे आणि बावन्न इंच घेराच्या तुमानी लागतात. उंची कमी असल्याने हरिदास तुमानींचा खालचा भाग कापून त्याच्या पिशव्या शिवून घेतो. त्या पिशव्या बाजारहाट करताना वापरतो. महिला जशा बाहेर जाताना मॅचिंग वस्त्रे परिधान करतात तसेच हरिदास देखील बाहेर जाताना तुमानींची मॅचिंग पिशव्या वापरतो. तर सांगायची गोष्ट अशी की गेल्या महिन्यात म्हणजे 31 डिसेंबर रोजी पार्टी चालू असताना आम्ही हरिदासचे समुपदेशन केले. त्याने कमी खावे, जमल्यास दीक्षित डायट प्लान अंगीकारावा, नियमित व्यायाम करावा असे त्याच्या कानीकपाळी सांगितले. तो खाली मान घालून समोरच्या ताटातले पदार्थ संपवत राहिला. आम्ही बोलत होतो. तो खात होता. तो खात होता आणि आम्ही बोलत होतो.
शेवटी आम्हाला बोलून बोलून धाप लागली. त्याचाही खाद्ययज्ञ आटोपला. फिंगरबोलमध्ये हात धुवून आणि पुसून झाल्यावर त्याने एक तृप्तीचा ढेकर दिला आणि उद्यापासून व्यायामाला यायचं कबूल केलं. आणि अहो आश्चर्यम्. एक जानेवारीपासून तो खरोखरच नियमित येऊ लागला. एक किलोमीटर नव्हे, पण थोडेसे चालू लागला. आम्ही खूश झालो. पण आमचे समाधान अल्पजीवी ठरले. कारण मकर संक्रांतीनंतर हरिदास गायब झाला. आम्हाला वाटलं, त्याला बरं वाटत नसेल. दोन दिवस वाट बघून आम्ही शनिवारी सकाळी बागेतला व्यायाम आटोपल्यावर त्याच्या घरी मोर्चा नेला. स्वारी मजेत कोचावर बसून पोहे आणि लाडू खात होती.
“अरे, व्यायाम का बंद केलास? अशाने तू सडपातळ कसा होशील? फोटो काढताना पोट आत खेचून श्वास रोखण्याच्या कटकटीतून कसा सुटशील’.
“मी व्यायाम करणार नाही. खाण्यावर कंट्रोल ठेवणार नाही,’ त्याने गर्जना केली.
“आणि पोटाचं काय? पोट आत ओढून श्वास रोखलेल्या लोकांचे फोटो बेक्कार येतात.
फोटो काढताना मी मागच्या रांगेत उभा राहीन,’ तो म्हणाला आणि आम्ही निरुत्तर झालो.
विजय तरवडे