बुलढाणा : बुलढाण्यात समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातानंतर लागलेल्या आगीत २५ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला. नागपूरहून पुण्याच्या दिशेने जाताना बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा येथे हा अपघात झाला. या अपघातावर सर्व राजकीय नेत्यांनी प्रतिक्रिया देत शोक व्यक्त केला आहे. त्याच पार्श्वभूमीवर आता शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली.
“समृद्धी महामार्गाला अनेकांचे शाप लागले आहेत. त्यामुळे तो शापित महामार्ग आहे,” असे मत संजय राऊतांनी व्यक्त केले. ते आज सकाळी माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. “समृद्धी महामार्ग शापित महामार्ग झाला आहे. तो शापित का झाला याच्या खोलात जावं लागेल. तो महामार्ग बनवण्यासाठी सरकारने मनमानी केली. याबाबत अनेक गोष्टी आहेत. त्या भविष्यात समोर येतील, पण दुर्दैवाने त्या रस्त्यावर वारंवार अपघात होत आहेत, वारंवार मृत्यू होत आहेत. हे काही चांगलं नाही.”असे देखील संजय राऊत यावेळी म्हणाले.
“कितीवेळा श्रद्धांजल्या वाहायच्या. आम्ही अनेकदा समृद्धी महामार्गावरील वेगमर्यादेची मागणी केली आहे. त्याविषयी काहीच होत नाही. तो रस्ता भ्रष्टाचारातून तयार झाला आहे. त्या रस्त्यासाठी अनेकांच्या जमिनी हडप करण्यात आल्या. जबरदस्तीने जमिनी घेण्यात आल्या. त्या रस्त्याला अनेकांचे शाप आहेत आणि त्या रस्त्यात मला अनेकांचे अश्रू दिसत आहेत,” असे मत संजय राऊत यांनी यावेळी मांडले.