अतिवृष्टी कार्यक्षेत्रातील नगरपालिकांच्या निवडणुका पुढील टप्प्यात
सातारा – जिल्ह्यातील कमी अतिवृष्टीच्या कार्यक्षेत्रातील कराड, फलटण, वाई, रहिमतपूर आणि म्हसवड अशा पाच नगरपालिकांचा निवडणूक कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगाने आज जाहीर केला. या संदर्भातील आदेश राज्य निवडणूक आयोगाचे सचिव किरण कुरुंदकर यांनी जाहीर केला. या कार्यक्रमानुसार 18 ऑगस्ट रोजी मतदान आणि 19 ऑगस्ट रोजी मतमोजणी होणार आहे. पाच नगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये आजपासून आचारसंहिता लागू झाली आहे.
राज्य निवडणूक आयोगाने 17 जिल्ह्यातील 92 नगरपरिषदा आणि चार नगरपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. सार्वत्रिक निवडणुकांच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयात दाखल याचिका या न्यायालयाच्या निर्णयाच्या अधीन असतील असे सूचित करण्यात आले आहे. कराड, फलटण, वाई, रहिमतपूर, म्हसवड या पाच नगरपालिकांच्या अंतिम प्रभाग निहाय मतदार याद्या निवडणूक आयोगाने 5 जुलै रोजी जाहीर केल्या असून मतदान केंद्रनिहाय अंतिम याद्या 9 जुलै रोजी जाहीर केल्या जाणार आहेत.
20 जुलै रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर करावयाचा आहे. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याचा कालावधी दि. 23 व 24 जुलै सुट्टीचे दिवस वगळून 22 जुलै सकाळी 11 ते 28 जुलै दुपारी तीन वाजेपर्यंत आहे. नामनिर्देशन पत्रांची छाननी व उमेदवारांची यादी दि. 29 जुलै सकाळी 11 ते 3 यावेळेत जाहीर होणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिनांक 4 ऑगस्ट दुपारी तीन वाजेपर्यंत आहे. यासंदर्भात कोणतेही अपील असल्यास उमेदवारांनी आठ ऑगस्टपर्यंत आपल्या हरकती दाखल करण्याच्या सूचना निवडणूक आयोगाने दिल्या आहेत.
9 ऑगस्ट रोजी संबंधित उमेदवारांना निवडणूक चिन्ह दिले जाणार असून चिन्हासह उमेदवार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. 18 ऑगस्ट रोजी सकाळी साडेसात ते साडेपाच या दरम्यान मतदान होईल. दि. 19 ऑगस्ट रोजी मतमोजणीचा निकाल सकाळी दहा वाजल्यापासून जाहीर केला जाणार आहे. आयोगाने पश्चिम महाराष्ट्र व मराठवाड्यातील कमी पावसाच्या कार्यक्षेत्रातील निवडणुका पहिल्या टप्प्यात घेण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी महसूल विभागाला निर्देशित केले असून आचारसंहितेची गडबड सुरू झाली आहे. जिल्ह्यातील आठ नगरपालिकांपैकी अतिवृष्टीच्या क्षेत्रातील सातारा, महाबळेश्वर, पाचगणी आणि मेढा नगरपंचायत या चार नगरपालिकांचा निवडणुका पुढील टप्प्यांमध्ये होणार आहेत.