गोरखपूर – उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सत्तेवर येण्याआधी खूप आश्वासने दिली. मात्र, सत्ता मिळाल्यावर त्यांनी आश्वासनांची पूर्तता केली नाही. त्यामुळे योगींना पुन्हा त्यांच्या मठात पाठवा, असे आवाहन बसपच्या प्रमुख मायावती यांनी शनिवारी मतदारांना केले.
योगींचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या गोरखपूरमध्ये मायावती यांची सभा झाली. त्या सभेत मायावती यांनी प्रामुख्याने योगी आणि सत्तारूढ भाजपवर टीकेची झोड उठवली. योगींची मानसिकता संकुचित आणि जातीयवादी आहे. त्यामुळे त्यांनी गरिबांबरोबरच समाजाच्या विविध घटकांकडे दुर्लक्ष केले.
योगींच्या सरकारमुळे उत्तरप्रदेशात बेरोजगारी, महागाई वाढली आहे. कामगार मोठ्या प्रमाणात स्थलांतर करत आहेत. उत्तरप्रदेशात बसपचे सरकार आल्यास रोजगार संधी निर्माण केल्या जातील. त्यामुळे जनतेला उपजीविकेसाठी इतर राज्यांत जावे लागणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने खासगीकरणाचे धोरण अवलंबले आहे. त्यामुळे आरक्षण निरर्थक बनले आहे, असा आरोपही मायावती यांनी केला. उत्तरप्रदेशात विधानसभा निवडणुकीसाठी एकूण सात टप्प्यांत मतदान होणार आहे. आता त्या राज्यात केवळ दोन टप्प्यांसाठीचा प्रचार बाकी आहे.