कुरवली – कुरवली (ता. इंदापूर) येथील परिसरातील चिखली, जांब, मानकरवाडी, उद्घट, तावशी तसेच माळशिरस तालुक्यातील नीरा नदीलगतच्या गावातील बीएसएनएल व जिओ कंपनीचे खंडीत सेवेमुळे हजारो ग्राहकाना आर्थिक भुर्दंड व मनस्ताप सहन करावा लागत आहे. हजारो ग्राहकांना आर्थिक व मानसिक त्रास सहन करून कधी सेवा पूर्ववत सुरू होईल, या आशेवर राहण्याची वेळ आली आहे.
भारत दूरसंचार निगम व जिओ कंपनीच्या खंडीत सेवेमुळे परिसरात सध्या नागरिकांना रामभरोसे रहावे लागत आहे. गावातील खासगी जागेवर बीएसएनएलच्या मनोऱ्यावरून जिओची (शेअरिंग) सेवा पुरवठा होत असल्यामुळे एकाचवेळी दोन्ही सेवेपासून ग्राहकांना वंचित रहाण्याची वेळ आली आहे. दोन महिन्यांपासून आठ ते दहा दिवस तर कधी पंधरा दिवस सलग सेवा खंडीत रहात असल्याने बीएसएनएल व जिओचे ग्राहक हैराण झाले आहेत. ज्या ग्राहकांनी तीन महिन्यांच्या सेवेसाठी कोणी दोनशे, चारशे, सहाशे व सोळाशे रुपये खर्च करून “रिचार्ज’ केले आहेत, अशा ग्राहकांना मोबाइल कंपनीच्या अनागोंदी कारभारामुळे तोटा सहन करावा लागत आहे.
शेतकऱ्यांना बीएसएनएलने कृषी प्लॅनच्या माध्यमातून अनेकांना आकर्षित केले. त्यातून हजारो शेतकऱ्यांनी बीएसएनएलची निवड केली. या शेतकऱ्यांना कोणत्याही शेतकऱ्यांना सेवेचा लाभ मिळत नसल्याचे तक्रार आहे. ग्रामीण भागात नेटवर्कचे जाळे निर्माण करीत जिओच्या वतीने आकर्षक ऑफरद्वारे नागरिकांना भुरळ घातली. त्यामुळे शेकडो नागरिकांनी आयडिया, एअरटेल, वोडाफोन अशा खासगी कंपनीची सेवा नाकारून अनेकांनी नंबर पोर्ट करून घेत जिओची निवड केली.
सुरुवातीला काही दिवस सुरळीतपणे सेवा दिल्यानंतर कधी जनरेटर बंद, थकीत वीज बिल अडचण, खासगी जागेत उभारणी केलेल्या जागा मालकाचे थकीत जागा भाडे आदी कारणामुळे दोन महिने जिओ व बीएसएनएलचे ग्राहक सेवेविना वंचित आहेत. काही ग्राहकांनी तीन महिन्यांच्या प्लॅनसाठी चारशे रुपये व अनेकांनी सोळाशे रुपये खर्च करून इंटरनेट डाटा व फोनसाठी रिचार्ज केले आहे. परंतु सर्व पैसे पाण्यात गेले आहेत. बीएसएनएल व जिओ कंपनीच्या सेवा तातडीने सुरू न झाल्यास जिल्हाधिकारी, ट्राय व ग्राहक मंचाकडे निवेदन व तक्रार करणार असल्याचे स्थानिक नागरिकांनी सांगितले.
दोन्ही कंपन्यांचे हात वर
इंदापूर तालुक्यातील मोबाइल सेवेबाबत बीएसएनएल अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता, थकीत वीज बिलाचे अडचण पुढे करून वेळ टाळली जात आहे. वीज जोडणी तोडल्यामुळे सेवा बंद आहे. तसेच जिओ कंपनीकडून आम्ही आमचे भाडे व वीज बिल बीएसएनएलकडे जमा केल्याचे सांगत आहे. त्यामुळे दोन्ही कंपन्यांमधील परस्पर विधानामुळे ग्राहक मेटाकुटीला आला आहे.