मुंबई – हिवाळी अधिवेशनाचा आजचा चौथा दिवस असून सकाळपासूनच सभागृहात राजकीय वातवरण तापायला सुरुवात झाल्याचे पाहायला मिळाले. अशात उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसिद्ध दिशा सालियन प्रकरणाची एसआयटी मार्फत चौकशी करणार असल्याची घोषणा सभागृहात केली. यामुळे आता माजी पर्यावरण मंत्री आणि ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.
दिशा सालियनचा मृत्यू ही आत्महत्या असल्याचे या आधी सीबीआयने म्हंटले होते. परंतु यानंतर फडणवीसांनी एसआयटीची घोषणा केल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. भाजप आमदार अमित साटम यांनी एसआयटीच्या चौकशीची मागणी केली होती त्यानंतर इतर सदस्यांनी देखील ही मागणी लावून धरली. त्यासोबतच महिला आमदारांनी देखील याबाबत सत्य बाहेर यावं अशी मागणी केली त्यानंतर उपमुख्यमंत्री फडणवीसांनी ही मागणी मान्य करत असल्याची घोषणा केली.
यानंतर विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी सत्ताधाऱ्यांचा सीबीयावर विश्वास नाही ना ? असा सवाल उपस्थित केला. संपलेलं जुन प्रकरण पुन्हा काढून सभागृहाचा वेळ वाया घालवला जातोय. मुख्यमंत्र्यांच्या विरोधात विरोधक मुद्दा काढतील प्रतिज्ञापत्र असल्यामुळे त्यांना उत्तर द्यायला जागा राहणार नाही. त्यामुळे ही नौटंकी चालू असल्याचे देखील अजित पवार यावेळी म्हणाले.