नवी दिल्ली – भारताचा माजी आंतरराष्ट्रीय मुष्टियोद्धा व आता व्यावसायिक मुष्टियुद्धात कार्यरत असलेला खेळाडू विजेंदर याने केंद्र सरकारच्या कृषी कायदाला विरोध दर्शवला आहे. जर केंद्राने हा कायदा मागे घेतला नाही तर देशाच्या क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च समजला जात असलेला खेलरत्न पुरस्कार परत करीन, असा इशाराही त्याने दिला आहे.
केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीत सध्या पंजाब आणि हरियाणातील शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांचे प्रतिनिधी आणि सरकार यांच्यातल्या चर्चेच्या फेऱ्यांमधून अद्याप काहीही ठोस निर्णय झालेला नाही; परंतु बाहेर शेतकऱ्यांना मिळणाऱ्या पाठिंब्यात वाढ होताना दिसत आहे. विजेंदरनेही या आंदोलनाला पाठिंबा दर्शवताना हा कायदा मागे घेतला नाही तर खेलरत्न पुरस्कार परत करीन असे सांगितले आहे.
विजेंदरने आंदोलक शेतकरी वर्गाची भेट घेतल्यानंतर आपली मते व्यक्त केली. त्याला देशातला सर्वोच्च क्रीडा पुरस्कार खेलरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. शेतकऱ्यांच्या मागण्यांना माझा पाठिंबा आहे.
सरकार ज्या पद्धतीने शेतकऱ्यांना वागवत आहे ते पाहता निषेध म्हणून माझा पुरस्कार व मिळत असलेले सर्व लाभ परत करीन. सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्यांचा विचार करावा, असेही मत त्याने व्यक्त केले आहे.