हिंजवडी -मुळशी मावळच्या सीमेवर असलेल्या कासारसाई धरण परिसरात फिरण्यासाठी आलेल्या अभियांत्रिकी शाखेच्या दोन विद्यार्थ्यांचा कासारसाई धरणात बुडून मृत्यू झाला. शशांक सिन्हा (वय 19 ), रविकुमार विनोदकुमार (वय 19 ) अशी मृत्यू झालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन्ही विद्यार्थी बिहार राज्यातील आहेत. ते आकुर्डी येथील डॉ. डी. वाय. पाटील आभियांत्रिकी महाविद्यालयात दुसऱ्या वर्षात शिक्षण घेत होते.
गुरुवारी (दि. 3) सकाळी दहाच्या सुमारास ते इतर चार मित्रांसह फिरण्यासाठी कासारसाई धरण परिसरात आले होते. त्यावेळी ते धरणाच्या पाण्याजवळ उभे होते. त्यातील तीन जण पाय घसरुन पाण्यात पडले. त्यातील एकाला उर्वरित मित्रांनी बाहेर काढले.
मात्र, पाणी खोल असल्याने शशांक व रविकुमार हे पाण्यात बुडाले. काही वेळानंतर त्यांना स्थानिक तरुणांनी दोघांना पाण्याबाहेर काढले असता त्या दोघांचाही मृत्यू झाला होता.