नागपूर – करोनाची संभाव्य तिसरी लाट व म्युकरमायकोसिस प्रतिबंधासाठी जिल्हा प्रशासनाने ग्रामीण भागावर लक्ष केंद्रित केले आहे. गेल्या दोन दिवसांत अधिकाऱ्यांनी शंभराहून अधिक गावे पिंजून काढली. तसेच ग्रामीण भागाला करोनाच्या सावटातून दूर काढण्यासाठी या मोहिमेतून गावागावाचा कृती आराखडा तयार केला जात आहे.
पालकमंत्री डॉ. नितीन राऊत यांनी ग्रामीण भागातील दौऱ्याचा एकीकडे धडाका लावला आहे. सलग दुसऱ्या आठवड्यात त्यांनी नागपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात आरोग्य यंत्रणा बळकट करण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्र व प्राथमिक उपकेंद्र यांना भेटी देणे सुरू केले आहे. सोबतच मोठ्या प्रमाणात गावागावांमध्ये प्रचार प्रसिद्धी मोहीम सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत.
त्यानुसार जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या मार्गदर्शनात तेरा तालुक्यांमध्ये 52 अधिकाऱ्यांना जबाबदारी वाटून देण्यात आली आहे. या अधिकाऱ्यांमार्फत प्रशासनातील गाव पातळीवर करोना, म्युकरमायकोसिस प्रतिबंधासाठी कोणती उपाययोजना करायची, गावामध्ये कसा कृती आराखडा तयार करायचा याबाबतचे मार्गदर्शन केले जात आहे.
यासंदर्भात कार्यशाळा घेऊन प्रशिक्षित करण्यात आले असून जिल्हा प्रशासन व जिल्हा माहिती अधिकारी कार्यालयामार्फत तयार करण्यात आलेल्या तज्ञ डॉक्टरांच्या व्हिडिओद्वारे गावागावात मार्गदर्शन केले जात आहे.
59 गावे करोनापासून अलिप्त
नागपूर जिल्ह्यामध्ये 59 गावे पहिल्या व दुसऱ्या लाटेत करोनापासून अलिप्त राहिली आहे. या गावांमध्ये स्वच्छता मोहीम, नियमित तपासण्या, लसीकरणाला शंभर टक्के प्रतिसाद, करोना नियमांचे काटेकोर पाळणे व अन्य उपाय योजना करण्यात आल्या होत्या. त्या उपाययोजना आता प्रत्येक गावात करण्याच्या सूचनादेखील या बैठकांमधून दिल्या जात आहे. प्रत्येक गावांमध्ये शंभर टक्के लसीकरण करण्यासाठी गावपातळीवरील सर्व कर्मचाऱ्यांना जबाबदारी देण्यात आली आहे.
सोबतच या सार्वजनिक उपक्रमात स्थानिक पदाधिकाऱ्यांनी स्वतःच्या कुटुंबापासून सुरुवात करून सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात येत आहे. तसेच प्रत्येक टीमकडून येणाऱ्या प्रतिसादावरून प्रत्येक गावच्या करोनाविरुद्ध लढायच्या आराखड्याची तयारी करत आहे.