नवी दिल्ली – देशात कोविडमुळे अडचणीत आलेल्या वर्गाला आर्थिक दिलासा देण्यासाठी बॅंकांनी 25 कोटी रुपयांपर्यंत कर्ज असलेल्या कर्जदारांच्या कर्जाच्या पुनर्रचनेच्या कामाला प्रारंभ केला आहे. देशातील बॅंकांनी अशा थकबाकीदारांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे.
ज्यांना आपल्या कर्जाचे पुनर्गठण करून पुन्हा काही रक्कम हवी आहे त्यांनी संपर्क साधावा, असे आवाहन करणारे संदेश द्यायला बॅंकांनी सुरुवात केली असून, यात बॅंक ऑफ इंडियाने आघाडी घेतली आहे. कर्जाच्या पुनर्गठणाच्या या योजनेला रिझर्व्ह बॅंकेकडून संमती मिळाली आहे. त्यामुळे अडचणीत आलेल्यांना पुन्हा आर्थिक मदतीचा हात मिळू शकणार आहे.
त्याआधारे त्यांना आपले व्यवसाय पुन्हा उभारता येणार आहेत. पंजाब आणि सिंध बॅंकेच्या संचालक मंडळानेही ही योजना मंजूर केली आहे. ती कर्जदारांसाठी लवकरच उपलब्ध होणार आहे. करोना काळातील लॉकडाऊनमुळे छोटे, लघू आणि मध्यम उद्योग बंद आहेत.
ते पुन्हा सुरू करण्यासाठी आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी नव्याने मिळणारे कर्ज उपयोगी ठरणार आहे. तथापि, त्याचा लाभ घेण्यासाठी नेमके किती जण पुढे येणार हा कुतूहलाचा विषय आहे. कारण मागच्या वेळी त्यासाठी बॅंकांना पुरेसा प्रतिसाद मिळाला नव्हता.