शर्मिला जगताप
एकविसाव्या शतकाच्या या दुसऱ्या चरणात तंत्र आणि यंत्राने जखडत चाललेले आपले जीवन, नानाविध कारणांनी निर्माण झालेली जीवनाला भोवळ आणणारी गतिमानता, त्यातून जन्माला आलेले परावलंबित्व; जीवनमूल्यांचा बदललेला अग्रक्रम आणि दिवसेंदिवस क्षीण होत चाललेली वाचनसंस्कृती या साऱ्यांचा विचार करता आजच्या समीक्षेला महत्त्व प्राप्त झाले आहे.
समीक्षेमुळे पुस्तकांपासून तुटत चाललेला आजचा समाज पुन्हा वाचनप्रवाहात येईल. आजच्या समीक्षाने तात्त्विक स्वरूपाच्या चर्चेबरोबरच कलाकृतीचे अलक्षित असणारे अनास्थ सौंदर्य उलगडून दाखविण्याची भूमिका स्वीकारली पाहिजे. त्यामुळे आजच्या वाचकाला कलाकृतीचे स्वत्व, सामर्थ्य आणि सौंदर्य नव्याने समजून येईल आणि त्याच्या रसिकतेला व्यापकत्व आणि प्रौढत्व प्राप्त होईल. साहित्यकृतीच्या स्थूल परिचयापासून खोलवरच्या मर्मापर्यंत ती वाचकांना घेऊन गेली; तर साहित्याविषयीची आवड अधिक वाढीस लागेल.
आजकाल अनेक मान्यवर समीक्षक धडपडणाऱ्या नवोदितांचे कसलेच लेखन फारसे वाचत नाहीत. नवोदितांचे लेखन वाचण्याचे टाळणे त्यांना प्रतिष्ठेचे वाटते. त्यामुळे आजच्या तरूण पिढीच्या कसदार लेखनाची उपेक्षाही घडते. वर्तमानकाळात आपल्या मराठी साहित्यात काय चालले आहे यांची प्राथमिक ओळख होण्यासाठी तरी समीक्षकाने या नव्या लेखनाचा मागोवा घेतला पाहिजे.
काही माणसे एखाद्या विहिरीतील पाणी पाहताना काठावर उभे राहून- फारसे आत न वाकता (आपण आत पडलो तर काय ह्या भीतीने) ते पाणी पाहतात. काही माणसे अर्धी-अधिक भरलेल्या विहिरीत पाण्यात बुडलेल्या पायरीपर्यंत जाऊन पाण्याचे दर्शन घेतात आणि ओंजळीत पाणी घेऊन न्याहाळतात, तर तिसऱ्या प्रकारची माणसे विहिरीच्या तळापर्यंत जातात. तळ शोधतात, त्यातले जिवंत पाण्याचे झरे न्याहाळतात आणि मनसोक्त पोहून वर येतात. समीक्षाक्षेत्रातही असेच प्रकार आढळतात. प्रा. वामन जाधव हे तिसऱ्या प्रकारच्या माणसासारखे समीक्षक आहेत. पाण्याची खोली जाणून घेणारे, आतले झरे शोधणारे.
ग्रामीण साहित्य ः प्रवाह आणि परिस्थिती या समीक्षाग्रंथात ग्रामीण साहित्यात चित्रित झालेल्या शेतकरी जीवनाचा धांडोळा, ग्रामीण साहित्यातील स्त्री जीवनाचे रूप-स्वरूप, जागतिकीकरणाचे झालेले-होणारे भले-बुरे परिणाम, ग्रामीण साहित्याच्या मर्यादा व भवितव्य, द. ता. भोसले यांच्या समग्र साहित्याचा केलेला परामर्श, अशा पाच गोष्टी समोर ठेवून समीक्षकाने लेखन केले आहे.