अरुण गोखले
संकल्प म्हणजे काय? तर मनाने ठरविलेली एखादी करावयाची गोष्ट. इतका त्या शब्दाचा साधा आणि सरळ अर्थ आहे. आपणही आपल्या जीवनात असे अनेक लहान मोठे संकल्प करतच असतो. अगदि उदाहरणच द्यायचे झाले, तर मी उद्यापासून रोज सकाळी लवकर उठेन. मी रोज नियमितपणे व्यायाम करीन. यापासून ते या वर्षी घर बांधायचंच हं, किंवा मी माझा स्वत:चा व्यवसाय चालू करणार किंवा मी माझ्या उद्योगधंद्याचा टर्नओव्हर हा अमुक एक लाखांनी वाढविणारच, यासारखे काही मोठे संकल्प.
ते करत असताना आपण त्या संकल्पांची यशस्वी पूतर्ता व्हावी, त्या कामात आपल्याला यश यावं म्हणून असे संकल्प हे काही खास दिवशी अर्थात नव्या वर्षाचा पहिला दिवस, स्वत:चा वाढदिवस अशा दिवशी करत असतो. “सत्य संकल्पाचा दाता हा तो भगवंत आहे’ हे तर बोधवचन आपल्याला चांगलेच माहीत आहे. कशाचा संकल्प करावा आणि त्यासाठी काय करावे हे समर्थ रामदासांनी त्यांच्या दासबोधात खूप छान सांगितले आहे.
संकल्प करताना त्याचा प्रारंभ, त्याचा श्रीगणेशा हा आपण उत्तम दिवस पाहून, वेळ पाहून सुरू करतो. या श्रीगणेशाला आपल्या संकल्प सिद्धीत फार मोठे महत्त्व आहे. कारण श्रीगणेश हा बुद्धीदाता, विघ्नहर्ता आणि कार्य सिद्धीदाता आहे. आपल्या संकल्पांची पूर्तता करण्यात आपण प्रयत्नात कुठे कमी पडू नये. आपले प्रयत्न, मेहनत, अभ्यास, चिकाटी, सातत्य हे कमी पडू नये.
आपली संकल्पपूर्तीची वाटचालही योग्य दिशेने व्हावी म्हणून हे ईश्वरी कृपेचे पाठबळ लाभणे फार आवश्यक असते. चांगले संकल्प, चांगल्या गोष्टी ह्यांची पूर्तता तर तो भगवंत करतोच. त्यासाठी केलेल्या आपल्या प्रामाणिक प्रयत्नांचे पुरेपूर असे फळ तो आपल्या पदरात घालतोही. आपण लौकिक जीवनातल्या अनेक गोष्टी मिळवण्याचा संकल्प करतो. ते संकल्प कधी संपूर्णत: तर कधी काही कमीजास्त प्रमाणात पूर्ण होतातही.
मी जीवनात प्राध्यापक, डॉक्टर, वकील, शिक्षक, उच्च अधिकारी, उत्तम खेळाडू, पायलट, सैनिक, देशभक्त, नेता होणार असे ठरवतो. पण आपण कधी तरी “मी माणूस होणार’ म्हणून ठरवतो का? मला वाटते की आपण नव्या वर्षाचा हाच संकल्प करायला हवा की मी माणूस होणार.