नवी दिल्ली – विमानतळ सुरक्षा नियंत्रकांनी देशातील 84 संवेदनशील विमानतळांवर मार्च 2020 पर्यंत बॉडी स्कॅनर बसवण्याची सुचना केली होती. पण आज सन 2022 सालचा जानेवारीचा महिना संपत आला तरी यातील एकाही विमानतळावर बॉडी स्कॅनर बसवला गेलेला नाही. केंद्र सरकारच्या अखत्यारीत असलेल्या एअरपोर्ट ऍथॉरिटी ऑफ इंडिया कडून हे बॉडी स्कॅनर्स अजून खरेदीच केले गेलेले नाहीत असे सांगण्यात येते.
सध्या विमानतळांवर मेटल डिटेक्टर्स आणि हाताने वापरायचे मेटल डिटेक्टर्स वापरले जातात. पण त्यांच्या मार्फत नॉन मेटॅलिक शस्त्रे किंवा स्फोटके शोधता येत नाहीत. त्यामुळे विमान सुरक्षेला मोठा धोका निर्माण होऊ शकतो अशी शक्यता व्यक्त करण्यात आल्याने या संवेदनशील विमानतळांवर बॉडी स्कॅनर सारखी यंत्रणा कार्यन्वित केली जावी अशी विमानतळ सुरक्षा नियंत्रकांची सुचना आहे.
या सुचनेनंतर एअरपोर्ट ऍथॉरिटी ऑफ इंडियाने 2020 मध्ये 198 बॉडी स्कॅनर्स संपादित करण्यासाठीची निवीदा प्रक्रिया सुरू केली होती. त्यासाठी तीन कंपन्यांनी निवादीही भरल्या होत्या. पण या निवीदा नंतर रद्द करण्यात आल्या. त्याचे कोणतेही कारण जाहीर करण्यात आलेले नाही. केवळ प्रशासकीय कारणास्तव ही टेंडर्स रद्द करण्यात आल्याचे एअरपोर्ट ऍथॉरिटीच्या लोकांकडून सांगण्यात येते.
आता नवीन निवादा कधी जारी करणार याचा कोणताही कार्यक्रम निश्चीत नाही.एअरपोर्ट ऍथॉरिटी ऑफ इंडियाकडे देशातील 137 विमानतळांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी आहे. त्यात 24 आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत. विमानतळ सुरक्षा नियंत्रकांनी यातील 28 विमानतळ अतिसंवेदनशील आणि 56 विमानतळ संवेदनशील म्हणून घोषित केले आहेत.
तेथे तातडीने ही बॉडी स्कॅनर्सची यंत्रणा कार्यान्वित केली जावी अशी त्यांची सुचना आहे. पण अजून तरी या सुचनेला वाटाण्याच्याच अक्षता लावल्या गेल्या असून त्यामुळे विमान प्रवासापुढील धोका अजून पुर्णपणे टळलेला नाही असे मानले जात आहे.