पेशावर – खैबर पख्तूंखवा भागातील दासू धरणाच्या बांधकामावर घेऊन जाणाऱ्या चिनी तंत्रज्ञांच्या बसमध्ये झालेल्या स्फोटात चीनच्या नऊ नागरिकांसह 13 जणांचा मृत्यू झाला. या बसमधून चिनी अभियंते, सर्वेक्षक आणि तांत्रिक कर्मचारी प्रवास करत होते. रस्त्याच्या कडेला पेरलेल्या भूसुरंगाचा हा स्फोट झाला की बसमध्ये स्फोटके होती याचा उलगडा तातडीने होऊ शकला नाही.
रॉयटर या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, खैबर परगण्यातील पोलीस महानिरीक्षक मुअझ्झम जाह अन्सारी यांनी सांगितले की, या परगण्यात झालेल्या स्फोटात नऊ चिनी नागरिक, दोन जवान आणि दोन स्थानिकांचा मृत्यू झाला आहे.
स्फोटानंतर ही बस खोल दरीत कोसळली. बसचा अक्षरश: चक्काचूर झाला. एक चिनी अभियंता आणि बसचा चालक अद्याप बेपत्ता आहे. या प्रकरणी मदत कार्याला वेग आला असून जखमींना एअर ऍम्ब्युलन्सने उपचारासाठी नेण्यात येत आहे.
पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला आहे. मात्र, हा हल्ल्याचा प्रकार वाटतो. घटनास्थळावर ते तपासासाठी हेलिकॉप्टरने रवाना होण्यापूर्वी अन्सारी बोलत होते.
हझारा भागातील ज्येष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्याने सांगितले की, या बसमध्ये 30 चिनी अभियंते होते. चीन पाकिस्तान इकानॉमिक कॉरिडॉर अंतर्गत दासू जलविद्युत प्रकल्प उभारण्यात येत आहे. या प्रकल्पात 65 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक केली जाणार आहे.
चीनकडून हल्ल्याच्या चौकशीची मागणी
चिनी नागरिकांच्या मृत्यूला कारणीभूत ठरणाऱ्या या बॉम्बस्फोटाची सखोल चौकशी पाकिस्तानने करावी, अशी मागणी चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने केली आहे. चिनी नागरिक, संस्था आणि प्रकल्पांची पाकिस्तानने काळजी घ्यावी, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते झिहाव लिज्जन यांनी दैनदिन वार्तालापात सांगितले. पाकिस्तानातील चिनी नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न हा कळीचा बनला आहे. चीनने पाकिस्तानमध्ये गेल्या काही वर्षात अब्जावधी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे.