औरंगाबाद – भाजपच्या टिनपाट प्रवक्त्यामुळे आज भारतावर नामुष्कीची वेळा आली असून तिकडे अरब राष्ट्रांमध्ये आपल्या पंतप्रधानांचा फोटो कचराकुंडीवर लावण्यात आला. तसेच भाजपची भूमिका ही देशाची भूमिका होऊ शकत नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर निशाणा साधला.
औरंगाबादमधील मराठवाडा सांस्कृतिक मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या सभेमध्ये ते बोलत होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला. हिंदूत्व भगव्या टोपीत असेल तर संघ काळी टोपी का घालतो? असा सवाल उपस्थित करत संघावरही टीका केली आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजप संदर्भातील सर्वच मुद्द्यावर प्रखर मत मांडले. तसेच भाजपने आपल्या प्रवक्त्यांच्या डोक्यात मेंदू असेल तर त्यांना काही गोष्टी शिकवाव्यात, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला.
उद्धव ठाकरे म्हणाले, भाजपचे प्रवक्ते सध्या वेगळ्याच मुद्द्यांवर बोलत आहेत. त्यांना काय गरज होती पैगंबर यांच्यावर बोलायची? जसे आपले देव-देवता आपल्यासाठी प्रिय, तसे त्यांचे देव हे त्यांना प्रिय आहे. कोणत्याही धर्माचा का तिरस्कार करायचा. पण भाजपच्या टिनपाट प्रवक्त्यांनी पैगंबर यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केले आणि भारताची नामुष्की झाली.
भाजपच्या वाचाळवीर प्रवक्त्यांनी आज आमच्या कुटुंबियांवर टीका केली. त्यांच्यामुळेच देशाची आंतरराष्ट्रीय स्तरावर नामुष्की होत आहे. त्यांच्यामुळेच आज ही परिस्थिती ओढावली आहे. त्यामुळे “कुठे नेऊन ठेवणार आहात महाराष्ट्र, कुठे नेऊन ठेवणार आहात हिंदुस्थान’ असा सवाल भाजपला विचारायला हवा.
तसेच आमच्या हिंदुत्वाची मोजमापी भाजपने करू नये, “हृदयात राम आणि हाताला काम’ असं आमचं हिंदुत्व आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
विरोधक अस्वस्थ…
गेली 25 वर्षे जे मांडीवर बसले होते, ते आता उरावर बसले आहेत. तर ज्यांच्याशी 25 वर्षे लढलो, त्यांनी मानसन्मान दिला. आता रोज सरकार पडण्याची हे स्वप्न पाहत आहेत. त्यामुळेच “मी परत येणार’ अशी वक्तव्य केली जातात. अडीच वर्षे झाल्यानंतरही हे सरकार कोसळत नाही, त्यामुळे विरोधक अस्वस्थ आहेत, असा टोलाही त्यांनी लगाविला.
भाषणातील महत्त्वाचे मुद्दे
– फडणवीस अयोध्येला बाबरी पाडण्यासाठी गेले होते का?
– दुसऱ्या धर्मांचा आदर करणे ही आम्हाला महाराजांनी दिलेली शिकवण
– विकासाच्या देशीने महाराष्ट्राला पुढी नेणारी ही अडीच वर्षे होती.
– हिंदुत्व भगव्या टोपीत असेल, तर संघ काळी टोपी का घालतं?
-बाळासाहेब नसते तर तुम्ही दिल्ली काबीज केली असती का?
– निवडणुका आल्यानंतर नको त्या खपल्या काढल्या जातात
– ईडी, सीबीआय लावा, पण काश्मीरमध्येही धाडी टाका
– संभाजीनगरला पाणी देण्याचे प्रशासनाला आदेश