नवी दिल्ली- राफेल विमान खरेदी प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मोदी सरकारला “क्लीन चीट’ दिली आहे आणि या निर्णयामुळे राहुल गांधी यांचा खोटेपणा उघड् झाला आहे. त्यामुळे कॉंगसचे नेते राहुल गांधी यांनी माफी मागावी, या मागणीसाठी भाजपच्यावतीने उद्या (शनिवारी) देशव्यापी आंदोलन केले जाणार आहे. भाजपचे सरचिटणीस भुपेंदर यादव यांनी पत्रकारांना याबाबत माहिती दिली.
लोकशाहीमध्ये वैचारिक मतभेद असणे समजू शकते. मात्र राहुल गांधी यांनी ज्याप्रकारे खोटेपणा पसरवला आणि सर्वोच्च न्यायालयाच्या टिप्पणीचा विपर्यास केल्यामुळे त्यांना बिनशर्त माफी मागायला लागली होती. वादग्रस्त वक्तव्य केले तेंव्हा राहुल गांधी कॉंग्रेसचे अध्यक्ष होते. त्यामुळे प्रथमच राष्ट्रीय पातळीवरील एखाद्या नेत्याला सर्वोच्च न्यायालयात माफी मागायला लागली, असे यादव म्हणाले.
राफेल व्यवहाराची संसदेच्या संयुक्त समितीकडून चौकशी करण्याची कॉंग्रेसच्या मागणीचाही यादव यांनी समाचार घेतला. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाच्या फेरविचाराची याचिका फेटाळून लावली असल्याची त्यांनी आठवण करून दिली.
न्या. जोसेफ यांनी वेगळ्या मुद्दयांवर ही याचिका फेटाळली आहे. त्यांनी वेगळ्या शब्दात हाच निकाल दिला आहे. फेरविचाराची मागणी न्यायालयाने एकमताने फेटाळलेली आहे. त्यामुळे या प्रकरणी राहुल गांधी यांनी देशवासियांची माफी मागावी यासाठी भाजप कार्यकर्ते जिल्हापातळीवर अंदोलन करणार आहेत. आज भाजपच्यावतीने दिल्लीत असे आंदोलन करण्यात आल्याचेही यादव यांनी सांगितले.