- मारहाण प्रकरणातून राजकीय पोळी भाजण्याच्या प्रयत्नाला अपयश
– संदीप घिसे
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीचे माजी सभापती विलास मडिगेरी यांना झालेल्या मारहाणीतून राष्ट्रवादी आणि शिवसेनेला बदनाम करून नामोहरण करण्याबरोबरच राजकीय पोळी भाजून घेण्याचा भाजपाचा “डाव’ सपशेल अपयशीच ठरल्याचे आता स्पष्ट झाले आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी सिद्ध करण्याबरोबरच दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांना जेलवारी घडवून आणण्याचे मनसुबेही अदखलपात्र गुन्हे दाखल झाल्याने धुळीस मिळाले आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेची 1 जून रोजी सर्वसाधारण सभा संपल्यानंतर स्थायी समितीच्या ऍण्टी चेंबरमध्ये फेब्रुवारी महिन्यातील “स्थायी’च्या सभांवरून सुरू झालेली मुद्यांची चर्चा गुद्यांवर पोहोचली होती. यावेळी माजी सभापती विलास मडिगेरी यांना कथित मारहाण झाल्याचा कांगावा भाजपाने गेल्या आठवडाभरापासून सुरू केला आहे. यासाठी महापालिकेतील पदाधिकाऱ्यांसह या पक्षाचे आमदारही पोलीस आयुक्तांना भेटले, निवेदने दिली मात्र केवळ अदखलपात्र गुन्हे दाखल झाले, ते ही परस्परविरोधी. यामुळे भाजपाचा डाव उधळला गेला.
या प्रकरणाला मोठे स्वरुप देण्यासाठी कथित मारहाण झालेला पदाधिकारी अद्यापही बिर्ला हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहे. या पदाधिकाऱ्याला खरेच मारहाण झाली की आणखी काय? याबाबत भाजपामध्येच अनेक मतप्रवाह आहेत. एक गट या संपूर्ण प्रकरणातून अंग काढून घेण्याच्या भूमिकेत आहे, तर दुसरा गट राहूल कलाटे आणि मयूर कलाटे यांना अडचणीत आणण्यासाठी खटाटोप करत आहे. यासाठी अंतर्गत बैठका घेऊन “पिस्तूल’ लावण्यापासून खंडणीचे गुन्हे दाखल करण्यापर्यंत खलबते रंगली. मात्र गुन्हे अदलखपात्रच दाखल झाले. त्यामुळे या पक्षाच्या काही ठराविक लोकांमध्ये प्रचंड अस्वस्थता निर्माण झाल्याचे पहावयास मिळत आहे.
कोणत्याही परिस्थिती शिवसेना आणि राष्ट्रवादीला बदनाम करण्याबरोबरच राहूल कलाटे व मयूर कलाटे यांना राजकीय आणि सामाजिक जीवनात बदनाम करण्याचा कट आखला गेला; मात्र तो प्रत्यक्षात उतरला गेला नाही. नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत अनेक नगरसेवकांनी या प्रकाराबाबत “ब्र’ शब्दही न उच्चारल्यामुळे या मारहाणीबाबत भाजपमध्येत मतैक्य नसल्याचे समोर आले आहे. याच पक्षातील एक गट तर विरोधकांनाच मदत होईल, अशी भूमिका घेत असल्यामुळे “मिशन’ मडिगेरी सध्यातरी अयशस्वीच झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
काय आहे प्रकरण?
स्थायी समितीमध्ये आर्थिक व्यवहार होतात हे उघड गुपित आहे. फेब्रुवारी महिन्यातील काही आर्थिक हिशोब अद्यापही न मिळाल्याचा राग सर्वपक्षीय नगरसेवकांच्या मनात होता. मात्र एका नेत्याच्या दबावामुळे भाजपाचे सदस्य गप्प होते. मात्र अन्य पक्षाच्या सदस्यांनाही हिशोब न दिल्यामुळे विरोधकांनी फेब्रुवारीतील हिशोब चुकता करण्यासाठी हे प्रकरण घडविल्याची दबकी चर्चा पालिका वर्तुळात रंगली आहे. या प्रकरणाला खासगी वाटाघाटीच्या प्रकरणाचीही किनार असल्याचे सांगण्यात येत असले तरी “हिशोब’ हेच मुख्य कारण असल्याचे बोलले जात आहे.
हात दाखवू अवलक्षण
महापालिकेतील सत्ताधारी पक्षनेते नामदेव ढाके यांनी या प्रकरणाला भ्रष्टाचार रोखल्यामुळे मारहाण झाल्याचे स्वरुप देऊन त्यांनी “हात दाखवून अवलक्षण’ घडवून आणले. स्थायीत काय घडते आणि सत्ताधारी भाजपाच्या कारभारातून होत असलेल्या भ्रष्टाचाराचे वाभाडे सर्वत्र निघत असताना मडिगेरी यांनी भ्रष्टाचार रोखल्यामुळे मारहाण झाल्याचा कांगावा ढाके यांनी केला होता. त्यांनी काढलेल्या पत्रकाची सध्या खमंग चर्चा पालिकेत सुरू असून, गेल्या तीन वर्षांत कोणी किती महापालिकेला “ओरबडले’ आणि कोणाचा किती “वाटा’ याची खमंग चर्चा सध्या सुरू आहे.
अजित पवार विरुद्ध देवेंद्र फडणवीस
कथित मारहाण प्रकरणावरून सध्या राजकीय वातावरण तापले आहे. या प्रकरणात राज्य पातळीवरील दोन नेत्यांनी लक्ष घातल्याची चर्चा सुरू आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या बाजूने अजित पवार हे उभे असल्याचे सांगण्यात येत आहे. तर स्थायी समितीच्या माजी सभापतीची बाजू देवेंद्र फडणवीस यांनी लावून धरली आहे. स्थानिक पातळीवरील मुद्याचा विषय गुद्याचा झाल्यानंतर राज्यातील नेत्यांनी घातलेले लक्ष हा देखील शहरवासियांसाठी कुतूहलाचा विषय बनला आहे.