Uddhav Thackeray – आगामी लोकसभा, राज्यसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गटाने जोरदार मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. कोकण दौऱ्यात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सभांचा धडाका लावला आहे. त्यांनी आज राजापूर येथील सभेत उल्हासनगर गोळीबार प्रकरणावरून पुन्हा एकदा भाजपावर निशाणा साधला आहे. रामराज्याचा नाही तर मरा राज्याचाआरंभ भाजपाच्या आमदाराने कल्याणमध्ये करून दाखवला, अशा शब्दात त्यांनी टीकास्र सोडले.
जनसंवाद यात्रेत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, एका माजी आमदाराने पोस्टर्स लावले की, संकल्पपूर्तीचा आनंद आणि रामराज्याचा आरंभ. हेच परवा भाजपाच्या आमदाराने कल्याणमध्ये करून दाखवलं. पण यांचं हे रामराज्य नाही तर मरा राज्य आहे. भर पोलीस स्टेशनमध्ये भाजपाचा आमदार जाऊन गोळीबार करतो आहे. त्याला का करावा लागला असेल गोळीबार? असा प्रश्न उपस्थित करत उद्धव ठाकरे म्हणाले की, आमदार नुसते कमळाबाईपुढे हे असे हतबलं झालेले नाही तर संपले आहेत, असा हल्लाबोल उद्धव ठाकरे यांनी केला.
जर एखाद्या शिवसैनिकांनी पोलीस स्टेशनमध्ये एखाद्या व्यक्तीच्या कानफटात मारली असती तर यांनी थयथयाट केला असता? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तर अकांडतांडव केला असता.
गुंडगिरी कशी चालली आहे हे बघा? असा प्रश्न उपस्थित करत उद्धव ठाकरे म्हणाले की, पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार झालेला असतानाही देवेंद्र फडणवीस आज कुठे आहेत याची कल्पना नाही. लापता आहेत असं आज मी ऐकलं. कारण त्यांना तोंडच नाही उत्तर द्यायला. त्यांच्या स्वतःच्या पक्षाच्या आमदारावर अशी वेळ का आली? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.