नवी दिल्ली – केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आल्यास देशात जातनिहाय जनगणना करण्याचे पहिले पाऊल उचलले जाईल. तसेच, आरक्षणावरील ५० टक्के मर्यादा हटवली जाईल, अशी ग्वाही कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोमवारी दिली.भारत जोडो न्याय यात्रेदरम्यान झारखंडच्या रांचीत राहुल यांची सभा झाली. त्यावेळी त्यांनी प्रामुख्याने जातनिहाय जनगणना, आरक्षणाचे मुद्दे उपस्थित केले.
सामाजिक आणि आर्थिक अन्याय हा सर्वांत मोठा मुद्दा आहे. मात्र, दलित आणि आदिवासींचे आरक्षण इंडिया कमी होऊ देणार नाही. समाजातील मागास घटकांना त्यांचे हक्क मिळवून देण्याची गॅरंटी मी देतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वत:ला इतर मागासवर्गीय (ओबीसी) म्हणवून घ्यायचे. मात्र, जातनिहाय जनगणनेची मागणी पुढे आल्यावर केवळ गरीब आणि श्रीमंत अशा दोनच जाती असल्याचे ते म्हणू लागले. ओबीसी, दलित आणि आदिवासींना हक्क देण्याची वेळ आल्यावर कुठली जात नसल्याचे मोदी म्हणतात. मात्र, मतं मागण्याची वेळ आल्यावर ते स्वत:ला ओबीसी म्हणवतात, अशी शाब्दिक टोलेबाजी राहुल यांनी केली.
आदिवासी मुख्यमंत्री मान्य नसल्याने भाजपने झारखंड सरकारला सत्तेवरून हटवण्याचा प्रयत्न केला. मात्र, झामुमो, कॉंग्रेसने सरकार वाचवले. भाजपकडून लोकशाही, राज्यघटनेवर हल्ले सुरू आहेत. जनतेचा आवाज दाबण्याचे प्रयत्न होत आहेत. मात्र, इंडिया आघाडी त्याविरोधात उभी राहील, असा निर्धार त्यांनी बोलून दाखवला.
कल्पना सोरेन यांची घेतली भेट
झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना काही दिवसांपूर्वी ईडीने अटक केली. त्या पार्श्वभूमीवर, राहुल यांनी रांचीत सोरेन यांच्या पत्नी कल्पना यांची भेट घेतली. त्या भेटीतून राहुल यांनी कॉंग्रेस सोरेन कुटूंबाच्या पाठिशी असल्याचा आणि इंडियामध्ये एकजूट असल्याचा संदेश दिला.