यवत, (वार्ताहर)- बारामती लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांचा दौंड तालुक्यातील विविध गावांमध्ये नियोजित गाव भेट दौऱ्याचे आयोजन केले होते. राष्ट्रवादी, भाजपा, शिवसेना या महायुतीचा सुनेत्रा पवार या उमेदवार आहेत. मात्र, सुनेत्रा पवार यांच्या नियोजित गावभेट व संपर्क दौऱ्यामध्ये भाजपाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची गैरहजेरी व काही ठिकाणी दोन ते चार कार्यकर्ते सोडले तर मोठ्या संख्येने नेत्यांनी दांडी मारल्याने दौंड तालुक्यात संभ्रम निर्माण झाला आहे.
सुनेत्रा पवार यांच्या सांयकाळी ७.३५ च्या सुमारास नाथाचीवाडी येथे दौरा होता. नाथाचीवाडीसह इतर काही गावात भाजपाचे पदाधीकारी यांनी कार्यक्रमास गैरहजेरी लावलेली होती. काही मोजकेच भाजपाचे कार्यकर्ते आम्ही बारामतीकर असल्याने उपस्थित राहिलो. अचानक ठरलेल्या दौऱ्यानिमित्त काही माहित नसल्याचे सांगत आहेत.गावाभेट दौऱ्यात सुनेत्रा पवार नागरिकांशी चर्चा केली.
दौऱ्यानिमित्त नाथाचीवाडी गावातील एका गावपुढाऱ्याने आमच्या दौंड तालुक्याला आत्तापर्यंत मंत्रिपद मिळाले नाही. तुम्ही आमदार राहुल कुल यांना मंत्रिपद देण्यासाठी शिफारस करावी आणि अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत अशी माजी आमदार रमेश थोरात यांच्यासमोर सुनेत्रा पवार यांच्याकडे मत व्यक्त केले.
हा दौरा कानगाव येथून सुरू होऊन हातवळण, कडेठाण, दापोडी, खोपडी, नानगाव, पारगाव, गलांडवाडी, खुटबाव, एकेरीवाडी, देलवडी, पिंपळगाव, नाथाचीवाडी, यवत येथे होता. देऊळगाव गाडा पीर यात्रेनिमित्त दर्शन घेऊन पार पडला.
यावेळी सुनेत्रा पवार यांच्यासोबत माजी आमदार रमेश थोरात, तालुकाध्यक्ष उत्तम आटोळे, विरधवल जगदाळे, उपाध्यक्ष तात्यासाहेब ताम्हाणे, अनिल नागवडे, भाऊसाहेब आवाळे, उद्धव चोरमले, दिगंबर ठोंबरे, योगेश हाके, संदीप गडदे, संजय इनामके, अनिल चोरमले, नागरिक उपस्थित होते.