सुप्रिया सुळे यांचे यशस्वी राजकारण खूपत असल्याने टीका
पिंपरी – चंद्रकांत पाटील यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर अभद्र भाषेत टीका करून आपल्या सडक्या मनोवृत्तीचे दर्शन घडविले आहे. सुप्रिया सुळे यांचे यशस्वी राजकारण पाटील यांना खुपत असल्यानेच त्यांनी ही टीका केली असून महिलांचा अवमान करणे ही भाजपची संस्कृतीच आहे, अशी टीका शहराचे माजी महापौर तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे मुख्य प्रवक्ते योगेश बहल यांनी केली आहे.
ओबीसी आरक्षणावरून भाजपने काढलेल्या मोर्चादरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी “घरी जा आणि स्वयंपाक करा, दिल्लीत जा नाहीतर मसणात जा’ अशी टीका केली होती. त्यावर आता राज्यभरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादीचे प्रवक्ते योगेश बहल यांनीही चंद्रकांत पाटील यांचा चांगलाच समाचार घेतला आहे. त्यांनी याबाबत एक पत्रक प्रसिद्धीस दिले असून त्यात म्हटले आहे की, सुप्रिया सुळे या तीन वेळच्या खासदार आहेत. महाराष्ट्रातील एक सुसंस्कृत, अभ्यासू नेतृत्त्व म्हणून त्या पुढे आल्या आहेत. त्यांना आतापर्यंत आठवेळा संसदरत्न म्हणून गौरविण्यात आले आहे. महाराष्ट्रातील महिलांचे प्रश्न त्या तळमळीने मांडत असल्याने त्यांना राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळतो आणि हीच बाब भाजपचे प्रदेशाध्यक्ष असलेल्या चंद्रकांत पाटील यांना खुपत आहे.
एका सुसंस्कृत आणि यशस्वी राजकारणी महिलेवर चंद्रकांत पाटील यांनी खालच्या शब्दात टीका करून अकलेचे तारे तोडले आहेत. भाजपाची मनोवृत्तीच महिलांविरोधी आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. शरद पवार यांनी महिलांना पन्नास टक्के आरक्षण दिल्याचा रागही भाजपला आहे. महिलांचे राजकारणातील नेतृत्त्व भाजप नेत्यांना मान्य नसल्याचेच यावरून अधोरेखित होत आहे. खालच्या भाषेत टीका करणारे चंद्रकांत पाटील हे मनोरुग्ण बनले असून त्यांच्या मेंदूची तपासणी करणे गरजेचे असल्याचा टोलाही बहल यांनी लगावला आहे.
एका महिलेच्या हक्काची जागा बळाकावून चंद्रकांत पाटील हे आमदार झाले आहेत. त्यामुळे त्यांना महिलांप्रति आदर असण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे चंद्रकांत पाटील यांनी केलेले हे वक्तव्य शुद्धीत केले की नशापाणी करून केले हे देखील तपासण्याची गरज आहे. सुप्रिया सुळे यांच्यासारख्या मेहनती आणि यशस्वी महिलेबाबत विधान करणारे चंद्रकांत पाटील यांचे सर्वसामान्य महिलांबाबतचे मत किती निम्न स्तराचे असू शकते? असा प्रश्न उपस्थित करत संपूर्ण महिलांचा अवमान करणाऱ्या चंद्रकांत पाटलांनी माफी मागावी, अशी मागणीही केली आहे.
शरद पवार आरक्षणाचे पाठीराखे
शाहू, फुले, आंबेडकरांचे विचार खऱ्या अर्थाने देशभर पोहोचविणारे शरद पवार हेच खरे आरक्षणाचे पाठीराखे असल्याचे त्यांनी आपल्या कर्तुत्त्वातून अनेकदा सिद्ध केले आहे. मंडल आयोगाने ओबीसी समाजाला दिलेल्या आरक्षणाची अंमलबजावणी शरद पवार यांनी देशात सर्वांत प्रथम महाराष्ट्रात केली होती. शरद पवार हेच ओबीसी समाजाला आरक्षण पुन्हा मिळवून देऊ शकतात, याची सर्वांना खात्री आहे. मात्र आरक्षणाचे केवळ राजकारण करून लोकांना भ्रमित करणाऱ्या आणि आरक्षणविरोधी मानसिकता असलेल्या भाजप नेत्यांच्या पायाखालची वाळू घसरू लागल्याने चंद्रकांत पाटील अभद्र टीका करत आहेत. तसेच शरद पवार यांनी महिलांना पन्नास टक्के आरक्षण दिल्याचा रागही भाजपला असल्यानेच भाजपनेते महिलांवर खालच्या भाषेत टीका करत असल्याचा आरोपही बहल यांनी केला आहे.