नवी दिल्ली – राजस्थानातील घडामोडींवरून त्या राज्यातील सत्तारूढ कॉंग्रेसचे टेन्शन वाढवणारा दावा भाजपने केला आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत हे स्वत:च बंडाच्या मार्गावर असल्याचे वाटते, असे भाजपने म्हटले आहे.
राजस्थानमधील कॉंग्रेसचे अनेक आमदार पाठिशी उभे राहिल्याने गेहलोत यांच्या जागी नव्या मुख्यमंत्र्याची निवड करण्याची पक्षश्रेष्ठींची योजना बारगळली. गेहलोत यांच्या समर्थक आमदारांनी त्या कृतीतून बंडाचे निशाण फडकावल्याचे मानले गेले. स्वत: गेहलोत यांनी समर्थक आमदारांनी घेतलेल्या भूमिकेमागे आपण नसल्याचे भासवण्याचा प्रयत्न केला.
त्या पार्श्वभूमीवर, भाजपच्या आयटी विभागाचे प्रमुख अमित मालवीय यांनी ट्विटरवर गेहलोत यांच्या भाषणाचा एक व्हिडीओ शेअर केला. त्यामध्ये गेहलोत कोल इंडिया या सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीची आणि केंद्रीय कोळसा मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या काही निर्णयांची प्रशंसा करताना आढळतात. त्याचा संदर्भ घेऊन मालवीय यांनी गेहलोत बंडाच्या पवित्र्यात असल्याचे भाकीत केले.
कॉंग्रेस नेते राहुल गांधी सातत्याने उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर टीका करतात. पण, काही दिवसांपूर्वी गेहलोत यांनी अदानींना निमंत्रण दिले. आता ते कोल इंडिया आणि जोशींची प्रशंसा करत आहेत. गेहलोत यांच्या कृती कॉंग्रेसशी विसंगत आहेत, अशी टिप्पणी मालवीय यांनी केली. कॉंग्रेस श्रेष्ठींच्या विश्वासातील नेते म्हणून गेहलोत यांच्याकडे पाहिले जात होते. मात्र, राजस्थानमधील घडामोडींमुळे कॉंग्रेसची नाचक्की झाल्याने त्यांच्यातील संबंध ताणले गेल्याचे मानले जाते.