नवी दिल्ली: राज्यात सत्ता स्थापनेवरून चांगलाच गोंधळ सुरु आहे. मतदारांनी शिवसेना-भाजप युतीला कौल दिला. पण हे दोन्ही पक्ष राज्याला स्थिर सरकार देऊ शकले. यांच्यातील अंतर्गत वादामुळे राज्यात राजकीय परिस्थिती चिघळली आहे. शिवसेनेने काँग्रेस-राष्ट्रवादीचा हात पकडत भाजपला एकटे पडण्याचा प्रयत्न केला आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शिवसेनेला नवीन फार्मुला दिला आहे.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी महाराष्ट्रातील सत्तासथापनेच्या गोंधळावर भाष्य केले. ते म्हणाले मी शिवसेना नेते संजय राऊत यांच्याशी बोललो होतो. भाजपला ३ वर्ष मुख्यमंत्रीपद आणि शिवसेनेला २ वर्ष मुख्यमंत्रीपद मिळावं, असे सुत्र त्यांना सुचवले त्यावर ते म्हणाले, जर भाजप सहमत असेल तर शिवसेना त्याबद्दल विचार करू शकेल. मी याबाबत भाजपशी चर्चा करेन, असे देखील आठवले म्हणाले.
आठवले म्हणाले, मी अमित भाईंना सांगितले की त्यांनी मध्यस्थी केल्यास काही मार्गाने कार्य केले जाऊ शकते. यावर शाह यांनी मला काळजी करू नका असे सांगितले. सर्व काही ठीक होईल. भाजप आणि शिवसेना सरकार स्थापनेसाठी पुढे येतील.
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना युतीला स्पष्ट बहुमत मिळाले. परंतु सत्तेच्या वाटपाबाबत या दोघांमध्ये चर्चा न झाल्यामुळे दोघांमध्येही वाद झाले आहेत. अगदी शिवसेनेनेही केंद्रात पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात एनडीए सरकारमधून बाहेर पडले आहे. त्यामुळे राज्यात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली आहे.