आळंदी-वंशाला दिवा हवा असा अट्टाहास आजही समाजात दुर्दैवाने कायम असल्याचे पाहायला मिळते. मुलगा काय मुलगी काय एक समान, बेटी बचावचा नारा देऊन समाजात स्त्रीभ्रूणहत्या थांबवण्याची मोठी मोहीम शासनस्तरावर हाती घेतली असतांना दुसरीकडे मात्र अजूनही “मुलगी’ समाजाला नकोशी का झाली आहे, हे उत्तर मिळत नाही.
आळंदी हे पवित्र तीर्थक्षेत्र संत ज्ञानेश्वर महाराजांचे समाधीस्थळ येथून वाहणाऱ्या नदीचे पात्र विस्तीर्ण याच नदी पात्रात भाविक पवित्र स्नान करतात; मात्र रविवारचे दृश्य मन हेलवणारे होते. एक नवजात मुलगी आकाशाकडे निरागसतेणे पहात होती.
जन्माला येऊन एक किंवा दोन दिवसच झाले असतील पण ज्या उदरात नऊ महिने ती वाढली ती माताच तिची वैरीण व्हावी? माय बापाला तिचे ओझे व्हावे? हे दृश्य जेव्हा मावळचे आमदार पै. सुनील शेळके यांनी पाहिले तेव्हा ते ढसाढसा रडायला लागले. लोकप्रतिनिधी किती संवेदशील असावा याचे दर्शन या निमित्ताने झाले. त्यांनी या नवजात नकोशीला दत्तक घेतलं आणि आपल्या उदात्तपणाचा परिचय दिला. पोलीस आता त्या अज्ञात जन्मदात्यांचा शोध घेत आहेत. पण या निमित्ताने “माणुसकीचा’ शोध लागला आहे. माणुसकीचे दर्शन घडविणाऱ्या आमदार सुनील शेळकेंचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.