वाघोली – स्वप्नील लोणकर या युवकाने एमपीएससी परीक्षा पास होऊनही अजून मुलाखत होत नाही आणि त्यामुळे नोकरी लागत नाही या राज्य सरकारच्या ढिसाळ कारभाराला कंटाळून आत्महत्या केली आहे.स्वप्निल लोणकर या युवकाची आत्महत्या म्हणजे राज्य सरकारच्या गलथान कारभाराचा बळी असून एम पी एस सी परीक्षा पास झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्याला न्याय मिळवून देण्यासाठी भाजप शेवटपर्यंत लढणार असल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश भाजप युवा मोर्चा कार्यकारणी सदस्य गणेश कुटे यांनी दिली.
यावेळी गणेश कुटे यांनी सांगितले की, पुर्व परिक्षा,मुख्य परिक्षा,मुलाखत अशा प्रकारे काठीण्याची उच्च पातळी पार करत एमपीएससी ची तयारी करीत असणारा प्रत्येक विद्यार्थी पुढे जात असतो, त्यानंतर त्याच्या पदरी यश प्राप्त होणार असते परंतु जर सरकारच्या निष्काळजी धोरणामुळे वर्षामागून वर्ष लोटूनही परीक्षाच होणार नसतील,त्यांच्या मुलाखती रखडणार असतील तर त्यामुळे त्या विद्यार्थ्याच्या भवितव्यास जबाबदार कोण? हा प्रश्न आज राज्यातले हजारो युवा विचारत आहेत आणि त्यामुळे स्वप्निल लोणकर याची ही आत्महत्या नसून राज्य सरकारच्या गलथान कारभाराचा नाहक बळी आहे. राज्यातील प्रत्येक एमपीएससीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्याला राज्य सरकारकडून न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे कुटे यांनी सांगितले.
भाजप जिल्हा कार्यकारणी,भाजप युवा मोर्चा, भाजप युवा मोर्चा विद्यार्थी आघाडी यांच्या माध्यमातून सरकारकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे. याबाबत पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांना भाजयुमो विद्यार्थी आघाडी चे जिल्हाध्यक्ष अमोल शिवले, भाजयुमो प्रदेश कार्यकारीणी सदस्य गणेश कुटे, विद्यार्थी जिल्हाउपाध्यक्ष संकेत पासलकर, शुभम तुपे व इतर यांच्या उपस्थिती मध्ये निवेदन देखील देण्यात आल्याचे कुटे यांनी सांगितले.