नवी दिल्ली – या वर्षाच्या एप्रिल महिन्यात संसदेचे वरिष्ठ सभागृह असलेल्या राज्यसभेत भारतीय जनता पार्टीने शंभरी गाठली होती. अर्थात राज्यसभेतील भाजपची सदस्यसंख्या प्रथमच शंभरवर पोहोचली होती व या पक्षाचे ते मोठे यश मानले गेले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह सगळ्याच बड्या नेत्यांनी हे मोठे यश असल्याची भावना व्यक्त केली होती. मात्र आता 57 जागांसाठी झालेल्या द्वैवार्षिक निवडणुकीचे निकाल काल जाहीर झाल्यानंतर भाजपचे या सभागृहातचे संख्याबळ पुन्हा घटले असून ते आता 95 वर आले आहे.
निवृत्त होत असलेल्या अर्थात मुदत संपलेल्या 57 सदस्यांसह राज्यसभेतील विद्यमान सदस्य संख्या सध्या 232 आहे. त्यात भाजपच्या 26 जणांचा समावेश होता. तर काल झालेल्या निवडणुकीत या पक्षाचे 22 जण निवडून आले आहेत. याचाच अर्थ भाजपच्या चार जागा कमी झाल्या आहेत. निवनियुक्त सदस्यांचा शपथविधी झाल्यावर भाजपचे संख्याबळ 95 वरून 91 पर्यंत खाली येईल. त्यामुळे पुन्हा 100 चा आकडा गाठण्यासाठी भाजपला आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.
राज्यसभेवर थेट नियूक्त केल्या जाणाऱ्या 7 सदस्यांसह 13 जागा रिक्त आहेत. त्या जेव्हा भरल्या जातील तेव्हा शंभरी पार करणे भाजपला शक्य आहे. मात्र त्याला अजुन किमान सहा महिन्यांचा कालावधी जावा लागेल.
एप्रिल महिन्यात झालेल्या राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपने आसाम, त्रिपुरा आणि नागालॅंड येथे प्रत्येकी 1 जागा जिंकत शंभर पर्यंत पोहोचण्याची कामगिरी केली होती. त्यानंतर आता 57 जागांसाठी अनेक राज्यांत निवडणूक झाली. यात 41 उमेदवार बिनविरोध निवडून आले. भाजपच्या 14 जणांचा त्यामध्ये समावेश होता.
उत्तर प्रदेशात भाजपला झाला लाभ
उत्तर प्रदेशातून राज्यसभेवर गेलेले या पक्षाचे पाच सदस्य निवृत्त झाले होते. मात्र आता 8 जण नव्याने निवडून आले आहेत. त्यामुळे येथे त्यांना तीन जागांचा फायदा झाला आहे. बिहार आणि मध्य प्रदेशात प्रत्येकी दोन तर झारखंड आणि उत्तराखंडमध्ये प्रत्येकी 1 जागा भाजपला मिळाली आहे.