श्रीनगर – खोऱ्यातील विशिष्ट समाजाला लक्ष्य करून सध्या हत्या करण्याचा प्रकार सुरू आहे. पण दहशतवाद्यांमध्ये निर्माण झालेल्या हताशपणाच्या भावनेतूनच हा प्रकार घडत आहे असे जम्मू आणि काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी म्हटले आहे. ते म्हणाले की, दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांना चूक करण्यास चिथावणी देण्यासाठीही हा प्रकार सुरू केलेला असू शकतो.
सुरक्षा दलांकडून चूक झाली की लोक त्यांच्या विरोधात रस्त्यावर उतरतात, त्यांना तेच हवे असते त्यामुळे आपण विशेष दक्षता घेतली पाहिजे असे त्यांनी म्हटले आहे.
ते म्हणाले की, निरपराध लोकांच्या टार्गेट किलिंगच्या घटना घडल्या आहेत, समाजाने त्याचा निषेध केला पाहिजे असे माझे मत आहे. मुलांना शिक्षण देणाऱ्या एका महिला शिक्षिकेची हत्या झाली, समाजाने त्याचा निषेध केला नाही तर मला वाटते, आपण आपल्या कर्तव्यापासून दूर जात आहोत, असे सिन्हा यांनी दक्षिण काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात एका कार्यक्रमात बोलताना सांगितले. ही हताश कृत्ये आहेत. पण ती कृत्ये करणाऱ्या गुन्हेगारांना आम्ही सोडणार नाही असे ते म्हणाले.
पोलिस, सुरक्षा दल किंवा जम्मू-कश्मीर प्रशासनाकडून निष्पाप व्यक्तीवर कोणतीही कारवाई होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. दहशतवाद शेवटच्या टप्प्यात आहे, आणि जेव्हा मेणबत्ती विझणार असते तेव्हा तिची ज्योत भडकते, असेही सिन्हा म्हणाले.