अहमदाबाद – पूर्व, पश्चिम, उत्तर असो की दक्षिण; देशातील वातावरण पाहता आम्हाला लोकसभेच्या ४०० पेक्षा अधिक जागा मिळतील. यावेळी भाजप दक्षिण भारतात आजवरची सर्वोत्तम कामगिरी करेल, असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरूवारी केला.
गुजरातच्या अहमदाबाद शहरातील भाजपच्या रोड शोमध्ये शहा सहभागी झाली. त्यावेळी पीटीआय वृत्तसंस्थेच्या प्रतिनिधीशी बोलताना त्यांनी देशभरात सर्वत्र भाजपला अनुकूल वातावरण असल्याचे म्हटले.
विरोधी पक्षांच्या इंडिया आघाडीला किती जागा मिळतील, या प्रश्नावर त्यांनी मिश्कील उत्तर दिले. आम्ही ४०० जागा जिंकणार असू; तर विरोधकांसाठी किती जागा उरतील याची कल्पना तुम्ही करू शकता, असे ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर शेतकरी, गरीब, महिला आणि तरूणांचा विश्वास आहे. मोदींना पाठिंबा देण्याविषयी त्यांच्यात उत्साह आहे, अशी टिप्पणीही शहा यांनी केली.
यावेळच्या लोकसभा निवडणुकीत ३७० जागा जिंकण्याचे लक्ष्य भाजपने निश्चित केले आहे. त्यातून भाजपचे नेते पक्षाच्या नेतृत्वाखालील आघाडी (एनडीए) ४०० पेक्षा अधिक जागा जिंकेल, असा दावा सातत्याने करत आहेत.