मुंबई : एका बाजूला शिवसेनेने मुख्यमंत्रीपदाची मागणी लावून धरली असतानाच भारतीय जनता पक्षाने स्वबळ मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. सुमारे 15 अपक्ष आमदरांचा पाठींबा भारतीय जनता पक्षाने मिळवला आहे. तर शिवसेनेने पाच अपक्ष आमदारांचा पाठींबा मिळवत आपले घोडे पुढे दामटण्याचा प्रयत्न सुरूच ठेवला आहे.
जनतेने महायुतीला कौल दिला आहे. त्यामुळे महायुतीचेच सरकार येणार, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. शिवसेनेने अद्याप आपली अधिकृत भूमिका जाहीर केली नाही. त्यांची गुरूवारी पक्षाच्या नवनिर्वाचित आमदारांची शिवसेना भवनात बैठक बोलावण्यात आली आहे. त्यात युतीत जायचे की बाहेरून सत्ता स्थापन करायची, याबाबातचा निर्णय त्यात होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, वारणा शैक्षणिक आणि उद्योग समुहाचे प्रमुख आणि जनसुराज्य पक्षाचे आमदार विनय कोरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंत्रालयात भेट घेऊन भारतीय जनता पक्षाला आपला पाठींबा जाहीर केला. त्याआधी चंद्रपूरचे अपक्ष आमदार किशोर जोरगेवार यांनी भाजपाला पाठींबा जाहीर केला. त्यामुळे भाजपाला पाठींबा देणाऱ्या आमदारांची संख्या 15 वर पोहोचली आहे. भाजपाचे स्वत:चे 105 आमदार आहेत. त्यामुळे भाजपाला 120 आमदारांचे समर्थन मिळाले असून 25 आमदारांची बेगमी केल्यास स्वबळावर ते सरकार स्थापन करू शकतात.
शिवसेनेने पाच अपक्ष आमदारांचा पाठींबा मिळवला आहे. त्यांचे संख्याबळ 62वर पोहोचले. या दोघांच्या राजकीय साठमारीकडे विरोधी राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस आघाडी लक्ष ठेवून आहे. त्यामुळेच याबाबतचे चित्र स्पष्ट झाल्यावर पक्षाचा विधीमंडळ गट नेता निवडावा या हेतूने राष्ट्रवादीने याबाबतची बैठक सायंकाळी ठेवली. मात्र सायंकाळपर्यंत शिवसेनेच्या भूमिकेबाबत अनिश्चितता कायम होती.