पाटणा -बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार पुन्हा भाजपच्या प्रदेश शाखेच्या निशाण्यावर आले आहेत. यावेळी महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यावरून भाजपने त्यांना घेरले आहे. तसे करताना भाजपने बिहारींना शिवसेनेकडून महाराष्ट्रात देण्यात आलेल्या वागणुकीची आठवण नितीश यांना करून देण्यात आली आहे.
पुढील लोकसभा निवडणुकीसाठी विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचे प्रयत्न नितीश यांनी सुरू केले आहेत. त्याचाच भाग म्हणून त्यांनी गुरुवारी बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्यासमवेत मुंबईत ठाकरे यांची भेट घेतली. त्यावरून भाजपचे बिहार प्रदेशाध्यक्ष सम्राट चौधरी यांनी नितीश यांच्यावर टीकास्त्र सोडले. ठाकरेंच्या दरबारात नितीश हजर झाले.
नितीश स्वत:चा पक्ष (जेडीयू) संस्थानाप्रमाणे चालवत आहेत. सर्वच प्रादेशिक पक्षांना ते लागू होते. त्यामुळेच नितीश सहलीवर जाताना युवराजांनाही (तेजस्वी) घेऊन जातात. शिवसेनेकडून झालेला अवमान बिहारी अजूनही विसरलेले नाहीत. त्यामुळे नितीश यांनी ठाकरे भेटीबद्दल जनतेला स्पष्टीकरण द्यावे, असे आव्हान चौधरी यांनी दिले. त्यावरून बिहारचे राजकारण तापण्याची शक्यता बळावली आहे.