मुंबई – “काय सांगावे कदाचित 2024 नंतर परिस्थिती बदलली तर शरद पवार पंतप्रधानही होतील. शरद पवार यांची एकंदर कारकीर्द संघर्षाची आहे. त्यांच्याकडे एक वेगळी ऊर्जा आहे.’ असं विधान ज्येष्ठ नेते नेते यशवंतराव गडाख यांनी केलं आहे. यावेळी ते माध्यमांशी बोलत होते. यशवंतराव गडाख यांचा आज 80 वा वाढदिवस आहे. त्यापार्श्वभूमीवर त्यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शरद पवार हे पंतप्रधान होऊ शकतात असं विधान केलं. तसेच, यावेळी त्यांनी सध्याच्या राजकीय परिस्थितीवर देखील आपलं मत व्यक्त केलं.
यशवंतराव गडाख नेमकं काय म्हणाले….
‘काय सांगावे कदाचित 2024 नंतर परिस्थिती बदलली तर शरद पवार पंतप्रधानही होतील. शरद पवार यांची एकंदर कारकीर्द संघर्षाची आहे. त्यांच्याकडे एक ऊर्जा आहे, जनता ही त्यांची ऊर्जा आहे. वैयक्तिक प्रश्न, तब्येतीचे प्रश्न आले पण त्यांनी त्यावर मात केली. याही वयात ते लोकांमध्ये जातात. लोकांमध्ये फिरत आहेत, ही हिंमत 82/83 व्या वर्षी या माणसात आहे. हा शेवटचा माणूस आहे इतकं राजकारण करणारा, दिल्लीत आजही त्यांचं वजन आहे’. अशी भावना यशवंतराव गडाख यांनी व्यक्त केली.
यावेळी बोलताना गडाख यांनी राज्यातील राजकीय परिस्थिती आणि शिवसेनेवरही भाष्य केलं. ते म्हणाले, “असे प्रसंग आणि संकट आयुष्यात अनेकवेळा येतात. माझ्यावरही अनेक प्रसंग आले. मी फक्त बोललो होतो तरीही माझी खासदारकी गेली आणि सहा वर्षे निवडणुकीला उभे न राहण्याची शिक्षा केली. पण मी धीराने तोंड दिले. उद्धव ठाकरे सुद्धा धीराने तोंड देत आहेत’. असं देखील यशवंतराव गडाख यावेळी म्हणाले.
नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील…
काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील याच संदर्भात एक विधान केलं होत. ते म्हणाले होते की, ‘मी देशातील सर्व भागांचा आणि राज्यांचा दौरा केला आहे. त्यावरून मी सांगू शकतो की, भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी 2024 मध्येही सरकार स्थापन करेल आणि नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील, असं अमित शाह म्हणाले होते. एका प्रसिद्ध वृत्तवाहिनीच्या मुलाखतीत ते बोलत होते.