बुध – कोरेगाव मतदारसंघातील शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांना शिवसैनिकांचा विसर पडल्याची शंका कार्यकर्ते व्यक्त करून लागले आहेत. श्री. शिंदे यांच्याभोवती पूर्वाश्रमीच्या भाजपचेच कार्यकर्ते दिसत असल्याने आगामी काळात शिवसेना कार्यकर्त्यांचा रोष त्यांना पत्करावा लागेल, अशी चिन्हे आहेत.
कोरेगांव मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व माजी पालकमंत्री शशिकांत शिंदे यांना पराभवाला सामोरे जावे लागले. या पराभवाची अनेक कारणे आहेत. पण गेल्या साठ वर्षाच्या राजकारणात पहिल्यांदाच कोरेगांव तालुक्याने खऱ्या अर्थाने कॉंग्रेसी विचारसरणी डावलून शिवसेनेचे आमदार निवडून दिले. महेश शिंदे जायंट किलर ठरले. स्थानिक स्वराज्य संस्थेतून थेट विधानसभेत त्यांनी धडक मारली.
कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना त्यांनी जिल्ह्यातील मजबूत पक्षाच्या प्रमुख नेत्याला पराभूत करणे हे त्यांचे यश विशेष आहे. पण या यशात ते ज्या पक्षाच्या निवडणूक चिन्हावर निवडून आले, त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांचेही कष्ट आहेत, हे विद्यमान आमदार विसरलेत की काय अशी शंका तालुक्यातील शिवसैनिकांच्या मनात आहे. त्यास महेश शिंदे यांची गेल्या दोन महिन्यांतील कार्यपध्दतीच कारणीभूत आहे.
विधानसभा निवडणुकीच्या काळात भाजपमध्ये असलेल्या महेश शिंदे यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आपले तिकीट निश्चित केले. मतदारसंघातील शिवसैनिकांनी कुठलाही विरोध न करता मातोश्रीचा आदेश शिरसावंद्य मानून प्रचारात झोकून दिले व आपल्या उमेदवाराला निवडून आणण्यासाठी कष्ट घेतले. या विजयात महेश शिंदे यांनी गेल्या चार वर्षात भाजपमध्ये असतानाच्या संघर्षाकडे डोळेझाक करूनही चालणार नाही.
कोरेगांव तालुक्यामध्ये भाजप पक्ष त्यांनी वाडीवस्तीवर पोहचवला. तरीही निवडणूक जिंकण्याच्या गणितात ते भाजपकडून निवडून येऊ शकत नाहीत हे ते पुरेपूर जाणून होते. कारण कोरेगांव तालुक्याचा मागील दोन निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवाराला सुमारे पंधरा हजार मते पडतात हे सिध्द झाले आहे. आणि याच मतांवर त्यांनी विजयाचा कळस बांधला. निकालानंतर पहिला महिना सत्तासंघर्षात गेला.
शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली नंतर महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आणि कोरेगांव तालुक्यातील शिवसैनिकांना दुहेरी आनंद झाला. कारण मुख्यमंत्री सोबत आमदारही शिवसेनेचा झाला. पण गेल्या महिनाभरातील घटनाक्रमावरून अनेक शिवसैनिकांचा हिरमोड झाला. कारण सत्ता व आमदार शिवसेनेचा असतानाही आमदारांबरोबर जुन्या मित्र पक्षाच्या कार्यकत्यांचे कोंडाळे दिसून येत आहे.
निवडून आल्यानंतर चालू केलेल्या आभार दौऱ्यात शिवसेनेचा एकही स्थानिक पदाधिकारी दिसत नाही किंवा त्यांना साधे आमंत्रण देण्याचे सोपस्कारही विद्यमान आमदारांकडून पार पाडले जात नाहीत. महिनाभरात दोन-तीन विकासकामांच्या उद्घाटनावेळीही फक्त भाजपचे पदाधिकारी दिसले. निवडून आल्यानंतर महेश शिंदे विधानसभा मतदारसंघातील शिवसैनिकांची बैठक घेऊन अडीअडचणींवर चर्चा करतील, असे वाटत होते. पण ती गोष्टही झाली नाही. शिवसेनेचे दुसरे आमदार व विद्यमान गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई चांगले असेच म्हणावे लागेल.
कारण कधीही तालुका सोडून न पाहणाऱ्या शंभूराज यांनी मंत्री झाल्यापासून शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या दोन बैठका घेतल्या. शिवसेना पदाधिकाऱ्यांना मदत करण्याचे आश्वासनही दिले. यातील एका बैठकीत तरमहेश शिंदेही उपस्थित होते. महेश शिंदे यांच्या कारकीर्दीला आता कुठे सुरूवात झाली आहे. त्यांच्या कार्यशैलीवर शिवसैनिक शंका घेऊ लागले आहेत. असेच जर चालू राहिले तर सामान्य शिवसैनिकांच्या रोषाला त्यांना सामोरे जावे लागेल, अशी चर्चा आहे.