मुंबई – राज्यात रोज आरोपांची चिखलफेक होत आहे. ज्यांनी आरोपांची परंपरा सुरु केली त्यांचीच आता पळताभूई होत आहे. सध्याच्या राजकारणामध्ये कुणीही कोणाकडे बोट दाखवू नये. निवडणुका जिंकण्यासाठी राजकारणाची पातळी खालावली. महाराष्ट्रावर राजकीय चिखलफेकीचा डाग लागत असून भाजपने ही नौटंकी बंद करावी, अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी विरोधी पक्षाला खडसाविले.
संजय राऊत म्हणाले, राज्यात रोज आरोपांची चिखलफेक होत असून महाराष्ट्रावर राजकीय चिखलफेकीचा डाग लागत आहे. या संदर्भात महत्वाच्या व्यक्तीने लक्ष घेऊन हे थांबवावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच राज्याची चिंता असलेले मुख्यमंत्री किंवा राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार हे यामध्ये पुढाकार घेऊ शकतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.
देशातील माणसांना कालपर्यंत असे वाटत होते की, महाराष्ट्रात चरस, गांजा, अफूचे पीक निघत आहे. आता असे वाटतेय की गुंड, बदमाश, दाऊदच्या माणसांशी संबंध असलेल्या लोकांचे राजकारण सुरू आहे. यामुळे महाराष्ट्राची सुरु असलेली बदनामी कुठतरी थांबविली पाहिजे, असेही ते म्हणाले.
तसेच भाजपच्या वॉशिंगमशीनमध्ये गेल्यानंतर भ्रष्ट माणसं शुद्ध होऊन येतात. भाजप सध्या बाहेरच्या लोकांना हायजॅक करत आहे. हायजॅक करणाऱ्या लोकांनी अजून काय हायजॅक केले, काय सांगता येत नाही. भडकलेल्या आगीत तेल टाकण्याचा प्रयत्न हे बाहेरुन आलेले नेते करत असल्याचा टोलाही त्यांनी लगाविला.
कर्मचाऱ्यांनीही त्याचा विचार करावा
करोना काळात एसटीचा तोटा मोठ्या प्रमाणात वाढल्याने अनेक अडचणी निर्माण झाल्या आहेत. महाराष्ट्रासारखं राज्य हे कधीही कष्टकऱ्यांच्या कामाला, त्यांच्या इमानीशी गद्दारी करणार नाही. एखाद्या संपामुळे लोकांचे हाल होत असतील तर कर्मचाऱ्यांनीही त्याचा विचार करावा. त्यांनी संप मागे घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.