शहरात ऐन हिवाळ्यातही पाणीप्रश्न गंभीर : प्रश्न मार्गी न लागल्यास दिला उपोषणाचा इशारा
नगर – शहराच्या अनेक भागात केवळ नियोजनाअभावी कृत्रीम पाणीटंचाई जाणवत असून, ऐन हिवाळ्यातच पाणीप्रश्न गंभीर झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या सत्ताधारी भाजपाच्या नगरसेवकानेच महापौर बाबासाहेब वाकळे यांच्या कार्यालयात उपोषणास बसण्याचा इशारा दिला आहे.
केडगाव येथील भाजपचे नगरसेवक मनोज कोतकर, सुरज शेळके यांनी शनिवारी (दि.16) दुपारी महापालिकेत येवून महापौर बाबासाहेब वाकळे यांची भेट घेतली. त्यांना कायनेटिक चौक परिसरातील रविश कॉलनी, सारस कॉलनी, आव्हाड विटभट्टी, प्रियंका कॉलनी, सुभद्रा नगर, धनश्री कॉलनी या परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे.
याबाबत अनेक वेळा मनपा प्रशासनास कळविले व सर्वसाधारण सभेत ही हा विषय मार्गी लावण्याचे सांगितले मात्र, याकडे मनपा प्रशासनाने पाठ फिरविली. याबाबत महापौर वाकळे यांनीच अधिकाऱ्यांना या भागाचा पाणीप्रश्न सोडविण्याच्या सुचना दिल्या होत्या. तरीही हा प्रश्न न सुटल्याने ऐन हिवाळ्यात नागरिकांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
हिवाळ्यात ही परिस्थिती तर उन्हाळ्यात काय अवस्था असेल? याची कल्पना करवत नाही. महापालिकेचे अधिकारी नगरसेवकांनी सांगितलेली कामे करीत नसतील तर नगरसेवकांनाही आता आंदोलनाचा मार्ग स्विकारावा लागेल. येत्या आठ दिवसात या भागाचा पाणीप्रश्न सुटला नाही. तर सत्ताधारी पक्षाचा नगरसेवक असुनही महापौर कार्यालयात उपोषण सुरु करु असा इशारा नगरसेवक मनोज कोतकर यांनी देवून महापौरांना घरचा आहेर दाखवला आहे.