नवी दिल्ली – भाजपने अटकेनंतरही दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल पदावर कायम असल्याविषयी आक्षेप घेतला आहे. केजरीवाल यांनी पदावर कायम राहणे देशाच्या राजकीय प्रवासातील अतिशय दुर्दैवी क्षण आहे. अतिशय वाईट स्वरूपाचे राजकारण म्हणून त्याकडे पाहावे लागेल, असे टीकास्त्र भाजपने सोडले आहे.
केजरीवाल मुख्यमंत्रिपदावर कायम राहणार असल्याची भूमिका आपकडून मांडली जात आहे. त्यावर भाजपच्या वतीने केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली. घोटाळा झाला नाही आणि केजरीवाल निष्पाप आहेत असे कुणीच म्हणताना दिसत नाही. घोटाळ्याच्या सूत्रधाराला अटक झाली आहे.
इतरांना नैतिकता, प्रामाणिकपणाचे धडे देणारी व्यक्ती तुरूंगातून सरकार चालवण्याची भाषा करत आहे, अशा शब्दांत त्यांनी केजरीवाल यांच्यावर निशाणा साधला. राजदचे प्रमुख लालूप्रसाद यादव यांना चारा घोटाळ्याशी संबंधित प्रकरणांत दोषी ठरवण्यात आले.
अटकेआधी त्यांनी किमान पत्नीला स्वत:च्या जागी मुख्यमंत्री बनवण्याचे पाऊल तरी उचलले, असेही ठाकूर म्हणाले. त्यांच्या वक्तव्यातून केजरीवाल यांच्या पदावर कायम राहण्यावरून त्यांना आणि आपला भाजप घेरणार असल्याचे सूचित झाले.