लखनौ -राजकीय प्रतिस्पर्ध्यांवर छापे टाकण्यासाठी भाजपकडून केंद्रीय यंत्रणांच्या अधिकाऱ्यांचा वापर होतो. नंतर त्याच अधिकाऱ्यांना निवडणुका लढवण्यासाठी तो पक्ष तिकिटे देतो, असे टीकास्त्र शिवसेना नेते संजय राऊत यांनी शनिवारी सोडले.
भाजपने उत्तरप्रदेशात सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) माजी अधिकाऱ्याला विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. त्याचा संदर्भ घेऊन राऊत यांनी केंद्रीय यंत्रणांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते येथे पत्रकारांशी बोलत होते. उत्तरप्रदेशात शिवसेना विधानसभेच्या 50 ते 60 जागा लढवणार आहे. त्यातील सुमारे 20 उमेदवार आम्ही जाहीरही केले आहेत.
भाजपने आमच्या उमेदवारांचा धसका घेतला आहे. त्यातून त्या पक्षाच्या निर्देशावरून आमच्या काही उमेदवारांचे अर्ज फेटाळण्यात आले. तसे असले तरी आम्ही उत्तरप्रदेशात ताकदीने लढू. पुढील लोकसभा निवडणुकीत उत्तरप्रदेशातील 15 ते 20 जागाही शिवसेना लढवेल, असे त्यांनी नमूद केले. त्यामुळे भाजपची मोठी ताकद असणाऱ्या उत्तरप्रदेशवर शिवसेनेने लक्ष केंद्रित केल्याचे मानले जात आहे.