BJP New Slogan: 2024 च्या लोकसभा निवडणुकीची तयारी जोरात सुरू आहे. दरम्यान, भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी नवीन घोषणा निश्चित केली आहे. ‘यावेळी 400 पार, तिसऱ्यांदा मोदी सरकार’ (‘अबकी बार 400 पार, तीसरी बार मोदी सरकार) असा हा नारा निश्चित केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
तसेच भाजपने लोकसभा आणि विधानसभा स्तरावरील संयोजक आणि सहसंयोजक निश्चित केले आहेत. लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि भाजप अध्यक्ष जेपी नड्डा संपूर्ण देशाचा दौरा करणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले. 22 जानेवारीपासून पंतप्रधान मोदींचा दौरा सुरू होणार आहे.
मंगळवारी (2 जानेवारी) नवी दिल्लीत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक पार पडली. आगामी लोकसभा निवडणुकीसंदर्भात या बैठकीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, पक्षाचे सरचिटणीस सुनील बन्सल, केंद्रीय मंत्री भूपेंद्र यादव, अश्विनी वैष्णव, मनसुख मांडविया यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. यावेळी हा नारा ठरविण्यात आला आहे.
याआधी भाजपने काय नारा दिला होता?
2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने ‘अच्छे दिन आनेवाले हैं’ असा नारा दिला होता. 2019 च्या सार्वत्रिक निवडणुका ‘फिर एक बार मोदी सरकार’ या घोषणेवर पक्षाने निवडणुका लढवल्या होत्या. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली भाजपने लोकसभा दोन्ही निवडणुका जिंकल्या होत्या.
दरम्यान, पीएम मोदींनी अलीकडच्या काळात अनेकवेळा दावा केला आहे की, भाजपवर लोकांचा विश्वास कायम आहे. अशा स्थितीत भाजपची विजयाची हॅट्ट्रिक असेल. लोकसभा निवडणुकीत एका बाजूला भाजपच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (एनडीए) आहे. दुसरीकडे, काँग्रेस, TMC, DMK आणि आम आदमी पार्टीसह अनेक पक्षांचा समावेश असलेली विरोधी आघाडी भारत (I.N.D.I.A.) आहे.