हैदराबाद – भारतीय जनता पक्षाच्या तीन मध्यस्थांनी अलिकडेच तेलंगणातील आमदार फोडण्यासाठी एका फार्म हाऊसवर तेलंगणा राष्ट्रीय समितीच्या चार आमदारांना शंभर कोटी रूपयांची रोकड देऊ केली होती. त्या मध्यस्थांनी आपण देशातील आठ सरकारे कशी पाडली आणि आता आणखी कोणती सरकारे आमच्या रडारवर आहेत याची माहिती दिली असून त्याचे गुप्त कॅमेऱ्याद्वारे रेकॉर्डिंग करण्यात आले आहे. हे रेकॉर्डिंग मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी काल रात्री उशिरा पत्रकार परिषदेत सादर केले आहे.
त्यांनी म्हटले आहे की हे रेकॉर्डिंग पेन ड्राईव्ह द्वारे तेलंगणा हायकोर्टाचे मुख्य न्यायाधिश, सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश, देशातील अन्य राज्यांचे मुख्य न्यायाधिश आणि विरोधी पक्षांच्या मुख्यमंत्र्यांना पाठवले जात असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच हे रेकॉर्डिंग ईडी आणि सीबीआय मुख्यालयांनाहीं पाठवले जाणार असून त्यानुसार त्यांनी योग्य ती कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.
तेलंगणात सरकार पाडण्यासाठी आलेल्या भाजपच्या मध्यस्थांना तेथील एका फार्म हाऊस वर तेलंगणा पोलिसांनी मोठ्या रकमेसह अटक केली आहे. त्यांनी आपल्या कृष्णकृत्यांची माहिती दिली असून त्याचे सारे रेकॉर्डिंग उपलब्ध असल्याचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी म्हटले आहे.
चंद्रशेखर राव यांच्याकडे एक तासापेक्षा अधिक कालावधीचे रेकॉर्डिंग उपलब्ध आहे. ही माहिती त्यांनी स्वत:च दिली आहे. तेलंगणा, दिल्ली, आंधप्रदेश आणि राजस्थान ही सरकारे पाडण्याचा भाजपचा कट पुर्ण उघड झाला असून देशातील सरकारे व लोकशाही वाचवण्यासाठी आता न्याय व्यवस्था आणि प्रसार माध्यमांनी पुढे आले पाहिजे असे आवाहनही त्यांनी केले आहे.
रामचंद्र भारती उर्फ सतीश शर्मा, तिरूपतीच्या एका मठाचा प्रमुख सिम्हयाजी, आणि हैदराबाद येथील एका हॉटेलचा मालक नंदकुमार अशी अटक करण्यात आलेल्या तीन जणांची नावे आहेत. भाजप नेते बी.एल. संतोषी यांनी आपल्याला तेलंगणातील आमदार फोडण्यासाठी पाठवले असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच अमित शहा यांचेहीं नाव त्यांनी तेथे घेतले आहे असा दावा तेलंगणा राष्ट्रीय समितीकडून केला जात आहे.