चंडीगढ – पंजाबमध्ये रविवारी आंदोलक शेतकऱ्यांनी एका भाजप कार्यकर्त्याच्या घराला घेराव घातला. त्यामुळे भाजपचे डझनभर नेते जवळपास 12 तास अडकून पडले. पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे अखेर सोमवारी पहाटे भाजप नेत्यांची सुटका होऊ शकली.
पंजाबमधील शेतकऱ्यांकडून केंद्रीय कृषी कायद्यांना तीव्र विरोध होत आहे. त्यातून आंदोलनाचा भाग म्हणून शेतकऱ्यांनी भाजपचे कार्यक्रम होऊ न देण्याचा पवित्रा स्वीकारला आहे. भाजपने रविवारी राजपुरामध्ये पतियाळा जिल्हास्तरीय बैठकीचे आयोजन केले होते.
ती बैठक शेतकरी आंदोलकांनी उधळली. त्यानंतर भाजपचे नेते एका कार्यकर्त्याच्या घरी जमले. त्या घराला शेतकऱ्यांनी घेराव घातला. त्या घराचा वीजपुरवठा शेतकऱ्यांनी खंडित केला. त्या घडामोडींनंतर भाजप नेत्यांनी वकिलामार्फत उच्च न्यायालयात याचिका दाखल केली.
त्या याचिकेची दखल घेऊन न्यायालयाने रविवारी रात्री भाजप नेत्यांची सुखरूप सुटका करण्याचा आदेश पोलिसांना दिला. त्यानंतर पोलिसांनी पुढील हालचाली करत भाजप नेत्यांना त्या घरातून बाहेर काढले.
त्यावेळी शेतकरी आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. दरम्यान, भाजप कार्यकर्त्यांनी अयोग्य भाषेचा वापर केला. एका नेत्याच्या अंगरक्षकाने पिस्तुलही बाहेर काढले, असा आरोप शेतकऱ्यांनी केला.