गंगाखेड – पुढील काळात देव व संतांचे सोहळे, आध्यात्मिक समारंभ करोनाचे सर्व नियम पाळून प्रातिनिधीक स्वरूपात होऊ द्यावेत. आध्यात्मिक कार्यक्रम होऊ दिले नाही तर वारकऱ्यांच्या वतीने व्यापक व उग्र स्वरूपात सत्याग्रह केला जाईल. असे करण्यास सरकारने भाग पाडून नये, अशी मागणी ह.भ.प. पंढरीनाथ महाराज भेंडेकर यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
महाराष्ट्र ही संतांची भूमी असून सकल संतमांदियाळीने समाजातील जातीयता नष्ट करत समाजातील एकोपा वाढवला. संत विचारांच्या प्रचार-प्रसारातून समाजातील सामाजिक जीवनाची प्रगल्भता शतकानशकते वाढत आहे. सृष्टाचक्राच्या अनुकूल व प्रतिकूल काळातही समाजामध्ये धैर्य आणि स्थैर्य टिकवण्याचे कार्य संतकडून घडत आले आहे. समाजातील आध्यात्मिक, सांस्कृतिक, ऐतिहासिक व सामाजिक जीवनाचे दर्शन संतांच्यामुळे घडत आहे.
अशा ह्या संत विचारांच्या मूल्यांची परंपरा म्हणजे आषाढीचा पायी वारी सोहळा. हा पायी वारी सोहळा रद्द करण्यात आला. इतर सर्व व्यवहार सुरु आहेत, मोर्चे, आंदोलनं, निवडणुका सर्व सुरू आहे. मात्र आध्यात्मिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे. सरकारने पुढील काळात आध्यात्मिक कार्यक्रम प्रातिनिधीक स्वरूपात होऊ द्यावेत अन्यथा सत्याग्रह केला जाईल, असे निवेदन ह.भ.प. पंढरीनाथ महाराज भेंडेकर, ह.भ.प. भगवान महाराज, ह.भ.प. आकाश महाराज खोकले, व्यंकटेश भेंडेकर, सिद्धेश्वर महाराज शेप यांनी तहसिलदार यांच्याकडे दिले.